Skip to main content

सोबत..!

                                         

                      "सोबत… काही क्षणी सोबत असावीच. अगदी जवळच्यांची. ती सोबत, क्षणाचा आनंद द्विगुणीत करते तर दुःखात आधार देऊन दुःख दूर करते. अशी सोबत… कायम असावी.. " 'ति'चं हे वाक्य, हे बोलणं भिडलं. काय चुकीचं बोलली ती? Input किंवा Output एकतर्फी असेल तर धोकादायक ठरतो. किंवा हानिकारक ठरतो. स्वगतापेक्षा संवाद अधिक प्रभावी.. अगदी प्रत्येक वेळी असतोच असं नाही. पण ज्या क्षणी शब्द आणि कधी कधी मौनाचं Give and Take सुरु होतं त्या क्षणी संवाद सुरु होतो. बहुतेक वेळा शब्दांशिवाय झालेला संवाद अधिक परिणामकारक ठरतो. तो थेट मनांचा, संवेदनांचा संवाद होतो. शब्दांची गरज संपते. 
                सोबत! मला तिची सोबत आहे. भावना, संवेदनांचं एका दिशेनं जाणारं दळणवळण तिच्या सोबतीमुळे दोन दिशांचं होतं. मनाचा, संवेदनांचा थेट संवाद सुरु होतो. परिणाम साधू लागतो. तिचं म्हणणं अधिकाधिक क्षणाक्षणाला पटत जातं. सोबतीचा असा काय परिणाम होतो? काय होतो??.. प्रश्न अवघड आहे. उत्तर शब्दात मांडणं कठीण आहे. आजवर या सोबतीमुळे कित्येक प्रसंगात मी ताळ्यावर आलो आहे. प्रचंड आनंद आणि त्यामुळे डोक्यात जाऊ पाहणारी हवा 'ति'च्या सोबतीमुळे ताळ्यावर आली आहे. काही प्रसंगात काही कारणांमुळे आलेली निराशा दूर झाली आहे. या नैराश्याचं प्रमाण कधी कधी खूप जास्त असायचं. एकंदर आयुष्याबद्दलच तिरस्कार, सगळं संपून गेल्याची भावना यायची. पण 'ति'च्याशी संवाद साधताना दोन टोकांचा प्रवास व्हायचा. प्रचंड निराश, हरलेल्या विचारांपासून ते आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी, काय वाट्टेल ते समोर आलं तरी त्याच्याशी लढून, झगडून पार होण्याची उमेद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होण्यापर्यंतचा हा प्रवास असतो. 
             सोबत! प्रत्येक वेळी असतेच असं नाही. गेले कित्येक दिवस ही सोबत हरवल्यासारखी झाली होती. सोबतीची, संवादाची गरज आत्यंतिक होती. ती आज मिळाली. हा खूप काळाच्या ताटातुतटीनंतर एकत्र आल्याचा आनंद आहे. मला… 'ति'ला. माझी 'ती'…. सोबती.. लेखणी….!!







Comments

  1. आता तिच्यापासून ताटातूट होऊ नये याची काळजी घ्या! ☺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...