Skip to main content

सोबत..!

                                         

                      "सोबत… काही क्षणी सोबत असावीच. अगदी जवळच्यांची. ती सोबत, क्षणाचा आनंद द्विगुणीत करते तर दुःखात आधार देऊन दुःख दूर करते. अशी सोबत… कायम असावी.. " 'ति'चं हे वाक्य, हे बोलणं भिडलं. काय चुकीचं बोलली ती? Input किंवा Output एकतर्फी असेल तर धोकादायक ठरतो. किंवा हानिकारक ठरतो. स्वगतापेक्षा संवाद अधिक प्रभावी.. अगदी प्रत्येक वेळी असतोच असं नाही. पण ज्या क्षणी शब्द आणि कधी कधी मौनाचं Give and Take सुरु होतं त्या क्षणी संवाद सुरु होतो. बहुतेक वेळा शब्दांशिवाय झालेला संवाद अधिक परिणामकारक ठरतो. तो थेट मनांचा, संवेदनांचा संवाद होतो. शब्दांची गरज संपते. 
                सोबत! मला तिची सोबत आहे. भावना, संवेदनांचं एका दिशेनं जाणारं दळणवळण तिच्या सोबतीमुळे दोन दिशांचं होतं. मनाचा, संवेदनांचा थेट संवाद सुरु होतो. परिणाम साधू लागतो. तिचं म्हणणं अधिकाधिक क्षणाक्षणाला पटत जातं. सोबतीचा असा काय परिणाम होतो? काय होतो??.. प्रश्न अवघड आहे. उत्तर शब्दात मांडणं कठीण आहे. आजवर या सोबतीमुळे कित्येक प्रसंगात मी ताळ्यावर आलो आहे. प्रचंड आनंद आणि त्यामुळे डोक्यात जाऊ पाहणारी हवा 'ति'च्या सोबतीमुळे ताळ्यावर आली आहे. काही प्रसंगात काही कारणांमुळे आलेली निराशा दूर झाली आहे. या नैराश्याचं प्रमाण कधी कधी खूप जास्त असायचं. एकंदर आयुष्याबद्दलच तिरस्कार, सगळं संपून गेल्याची भावना यायची. पण 'ति'च्याशी संवाद साधताना दोन टोकांचा प्रवास व्हायचा. प्रचंड निराश, हरलेल्या विचारांपासून ते आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी, काय वाट्टेल ते समोर आलं तरी त्याच्याशी लढून, झगडून पार होण्याची उमेद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होण्यापर्यंतचा हा प्रवास असतो. 
             सोबत! प्रत्येक वेळी असतेच असं नाही. गेले कित्येक दिवस ही सोबत हरवल्यासारखी झाली होती. सोबतीची, संवादाची गरज आत्यंतिक होती. ती आज मिळाली. हा खूप काळाच्या ताटातुतटीनंतर एकत्र आल्याचा आनंद आहे. मला… 'ति'ला. माझी 'ती'…. सोबती.. लेखणी….!!







Comments

  1. आता तिच्यापासून ताटातूट होऊ नये याची काळजी घ्या! ☺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

आर्थिक गुन्हेगारी: प्राचीन भारतीय विचार, वर्तमान आणि भविष्य

फोटो सौजन्य: एलिट मॅग द्वारा इंटरनेट  एक हजार रुपयाची वस्तू आपण विकत घेत असतो. दुकानदार विचारतो, बिल देऊ का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी दोन उत्तरे संभवतात. जर उत्तर हो असे दिले तर ती वस्तू उदाहरणार्थ दहा टक्के जीएसटी लागून अकराशे रुपयांना मिळेल. जर उत्तर नाही असे दिले तर तीच वस्तू हजार रुपयांनाच मिळेल. यात आपण शंभर रुपये वाचवतो. पण आपल्याही नकळत सूक्ष्म पातळीवर एका आर्थिक गुन्हेगारीला उत्तेजन दिलेले असते. कसे? बिल न घेता वस्तू खरेदी केली. त्याचे नगदी पैसे चुकते केले. पण ती गोष्ट कुठल्याही हिशेबाचा भाग नाही झाली. देवाण-घेवाण झालेली नगद ही बेहिशेबी संपत्ती झाली. (आता UPI च्या काळात अशा गोष्टी खूप कमी झाल्या आहेत, पण मुद्द्याच्या अनुषंगाने उदाहरण घेऊन पुढे जाऊ) आर्थिक गुन्हेगारीचे हे अत्यंत प्राथमिक स्वरुप झाले. कायदेशीरदृष्ट्या ते फारसे गंभीर नसेलही पण नैतिकदृष्ट्या नक्कीच आहे.  आर्थिक गुन्हेगारी ही अशा प्राथमिक, सुप्त अवस्थेपासून सुरु होते आणि त्याचे स्वरूप प्राथमिक ते उच्च पातळीवरचा भ्रष्टाचार, हिशेब वह्यांतील प्राथमिक गडबड ते प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा, प्राथमिक स्तरावरील ...