Skip to main content

आम्ही काय करणार आहोत??



"साहेब उद्या मी एक प्रेस कॉन्फ़रन्स बोलावणार आहे. त्यात मी ह्या शहरातल्या 10 सर्वात मोठ्या स्मगलर्सची नावं जाहीर करणार आहे. त्याचबरोबर राजकारणातील त्यांच्या गॉडफादर्सची नावंही मी जाहीर करणार आहे.."
मुंबईतील मरीन ड्राइव भागातील एका चकचकीत इमारतीच्या गच्चीवर कम्युनिस्ट कामगार पुढारी डीकास्टा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खासगी पण गुप्त संवाद सुरु आहे. डीकास्टाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणतात,
   " हे सगळ बोलण खूप सोपं आहे डीकास्टा! अरे मनात आणलं तर आम्ही स्मगलिंग चोवीस तासात बंद करू. पण सध्या ते तितकसं महत्वाचं नाही. राज्यात इतर प्रश्न महत्वाचे आहेत. गरीबी आहे. कित्येक गावात अजून वीज नाही. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावं लागतं... मनात आलं की कसं गलबलायला होतं.. त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत रे???

   "स्मगलारांना संरक्षण देणार, असाच याचा अर्थ होतो, साहेब!"
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटातील हा एक सूचक प्रसंग. एकाचवेळी दोन भिन्न विचारसरणीची माणसं, सत्ताकेंद्र काही वाक्यांमधून परिस्थिती मांडतात. प्रसंग 1970 च्या दशकातला असला तरी परिस्थितीत फारसा फरक नाही. काही तपशील बदलले आहेत. असं का? ही परिस्थिती का आहे? ह्यावर काहीच करता येणार नाही का? एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालायला लागतात.
       कुठल्याही मोठ्या शहरातला वाहतूक दिवे असणारा मोठा चौक घ्या. रहदारी अखंड वाहत असते. दिवा लाल झाला की थांबते. अचानक त्या वाहनांच्या घोळक्यात हातात गुलाबांचे गुच्छ, खेळण्या घेउन विकायला येणारी लहान मुलं दिसतात. गाड्यांच्या काचा शक्यतो खाली येत नाहीत. दुचाकीस्वार बघून न बघितल्यासारखे करतात. चौकाच्या एखाद्या कोपऱ्यात त्या अभागी मुलांची आई वगैरे असते. मांडीवर एखादं तान्हं मूल असतं. त्या मुलांच्या हातातल्या वस्तू आपण विकत घेउ शकत नाही. कारण गरज नसते. मन कितीही संवेदनशील असलं तरी तर्कशुद्ध विचार करणारं मन 'गरज नाही..!!' हे स्पष्ट बजावतं.मनात प्रश्न पडतात यांचं भविष्य काय? यांच्या शिक्षणाचं काय? हे असं आयुष्य देण्यासाठी त्या अभागी माता इतक्या मुलांना जन्माला का घालतात? पण मग अर्थस्त्रातली कठोर सिद्धांत डोक्यात येतात. शिक्षण नाही. त्यामुळे समज कमी. 'जितकी जास्त मुलं तितके काम करणारे हात' ह्या न्यायाने 'शिक्षणाचा अभाव- समज कमी- अधिक मुले जन्माला घालणे- गरीबी- कुपोषण' हे अखंड चालणारं वर्तुळ चालूच राहतं. हे वर्तुळ कुठे, कोण आणि कधी भेदणार? मुख्य म्हणजे कोण भेदणार??
         हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. ते पाहत असताना मुख्यमंत्र्याना पडणारे प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला पडतात. काही लोक ती प्रश्न डोक्यात घेउन 'मला काय त्याचे (?)' ह्या भावनेने पुढे जातात. काही लोकांच्या डोक्यात ती प्रश्न कायम घोळत असतात. ती त्या प्रश्नांच्या मुळाशी जातात. त्याचा अभ्यास करतात. काही लोक त्या अभ्यासाच्या पलीकडे जात ती प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतात. ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
         ह्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना मोर्चा आपसूक आर्थिक आणि राजकीय विचारसरणीकड़े वळतो. भांडवलशाही, काही वेळा crony capitalism कड़े वळणारी भांडवलशाही की साम्यवाद-समाजवाद? वास्तविक सदरची मांडणी ही समाजवादाकडे झुकणारी असली तरी दूसरी बाजू कायम डोळ्यासमोर येते. खुलं उद्योगक्षेत्र, खासगी भांडवलाला मान्यता, उद्योजकता विकास यामुळे देशाची झपाटयाने आर्थिक प्रगती झाली. ही वस्तुस्थिती नाकरता येत नाही. त्यामुळेच पुन्हा आर्थिक वृद्धी की विकास हे द्वंद्व उभं ठाकतं. सगळ करून पुन्हा वैचारिक गोंधळात आणि प्रश्नांकडे मोर्चा येउन ठेपतो. आणि मुख्यमंत्र्यांसारखंच वाक्य उच्चारावंसं वाटतं,
" त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत....??"

      

Comments

Popular posts from this blog

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...