Skip to main content

कुमार गंधर्व


  कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षापूर्वीच्याच कानांना 'आता अवधारिजो जी' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्ज लागला आणि त्यापूर्वी कोणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, "मारुजी भूलो ना म्हाने". अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारुजीमधल्या 'जी'वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अशा ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, 'सोहनीभटियार' आणि म्हणाला, "गेल्या काही वर्षात असे काही नवे राग आणि नव्या चिजा झाल्या आहेत." पु.ल. नावाच्या शब्दप्रभूने 'मंगल दिन आज' या गुण गाईन आवडी मधील व्यक्तिचित्रात पंडित कुमार गंधर्व या संगीतातील अलौकिक चमत्काराचे असे वर्णन केले आहे. 

पुल ज्याप्रमाणे त्या नव्या रागातील कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला असे वर्णन करतात, तो कोमल रिषभ लागला, म्हणजे काय झालं हे नीट सविस्तर समजावून सांगितल्याशिवाय काही मला कळणार नाही. पण एक गोष्ट नक्की की कुमार गंधर्वांचं गाणं काळजाला भिडतं. एक विलक्षण भावना मनात दाटते. ती भावना वर्णनातीत असते. आजतागायत ती तशीच आहे. त्यामुळेच कुमार गंधर्व या महापुरुषाबद्दल आपण भक्तिभाव यापलीकडे दुसऱ्या भावनेने पाहू शकत नाही. चिकित्सा वगैरे फार लांब राहिली. त्यांच्या कार्याचे आकलन जरी झाले तरी भरून पावलो. 

पुलंची त्या 'सोहनीभटियार' शी पहिली ओळख साक्षात कुमार गंधर्वांनी करुन दिली. माझी पहिली ओळख झाली राहुल देशपांडे यांच्या 'कुमार राग विलास' या कार्यक्रमात. इतर शास्त्रीय गायक गातात, किंवा स्वतः राहुल देशपांडेच गातात त्यापेक्षा हे वेगळं आहे. या मांडणीत एक विलक्षण आर्तता आहे. काळजात चलबिचल करणारी आर्तता आहे. ती सुरवात मनावर गारुड करणारी आहे. त्या दिवशी मनात ते "मारुजी भूलो ना म्हाने... अब घर तुम बिन राता डर लागे म्हाने" या शब्दांनी मनात विलक्षण खळबळ माजवली. त्याच धुंदीत एक निश्चय झाला की, साक्षात त्या गंधर्वांची गायकी ऐकली पाहिजे. 

आता श्रवण-दृश्यभक्ती साठी सर्वात मोठा आसरा म्हणजे युट्युब. त्या तंत्रज्ञानाच्या आश्रयाला गेलो. त्यानी निराश केलं नाही. कुमार गंधर्वांच्या गायनाचं भांडार खुलं झालं. सुरुवात अर्थातच सोहनीभटियार ने केली. पुन्हा तोच अनुभव. एकदा ऐकून समाधान होईना. त्या दिवशी तेवढा एकच राग किती वेळा ऐकला असेल माहिती नाही. युट्युब ही एक अशी अजब गुहा आहे की एकदा आत गेलात की जातच राहता. हे ऐकत असतानाच शेजारी रेकमेंडेशन मध्ये बिहाग होता. बिहाग हा मुळात आवडत्या रागांपैकी एक आहे. कुमार गंधर्व रचित बिहाग रागातील ती "मोरा मन.." बंदीश अशीच वेगळ्या जगात घेऊन जाते. एकामागून एक राग ऐकत गेलो. आणि एक गोष्ट परत ठसठशीतपणे जाणवली. ती म्हणजे प्रचलित शास्त्रीय संगीत गायकीपेक्षा ही गायकी काहीशी वेगळी आहे. आणि हेही तेवढ्याच तीव्रतेने जाणवलं की केवळ वगेळेपणाच्या अट्टाहासापायी हे केलेलं नाही. तर विचारपूर्वक झालेली ही कृती आहे. 


कुमार गंधर्वांचा आणखी एक महत्वपूर्ण आविष्कार म्हणजे भजन. त्यात सगुण-निर्गुण भजन सर्व आले. कुमारांच्या आवाजात जेव्हा 'उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला' हे कबीराचे शब्द येतात, तेव्हा त्या शब्दांतली भावना कुमार गंधर्वांपेक्षा थेट, काळजाला भिडेल अशी दुसरी कोणी मांडू शकणार नाही अशी खात्रीच पटते. कबीर, मीरा, तुलसीदासांच्या रचनांना कुमारांनी चढवलेला स्वरसाज असो की माळवी लोकगीते, माळवी लोकगीतांच्या धून हाती धरून नव्याने रचलेले राग असो हा गंधर्व क्षणोक्षणी अचंबित करत राहतो. शास्त्रीय संगीताचं आणि एकूणच संगीताचं सखोल चिंतन करणारा, ते पचवणारा आणि त्यातून नवनिर्मिती करणारा हा अवलिया कलावंत होता. 

कुमार गंधर्वांचं गाणं ऐन बहरात येत असताना त्यांना दुर्धर आजाराने गाठलं. अनेक वर्ष हा दैवी आवाज शांत होता. पण त्या शांततेच्या काळात हा अवलिया चिंतन करत होता. इतर अनेक आवाज, धून डोक्यात साठवीत होता. ते आजारपण जणू पुढल्या क्रांतिकारी नवनिमिर्तीसाठीच्या शांततेचा काळ ठरला. संगीतातला नवा विचार, नवी मांडणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असणारा हा कलावंत होता. तो विचार त्यांनी 'अनूप राग विलास' या श्रेष्ठ ग्रंथात मांडला आहे. तो विचार, मांडणीतली विविधता, नवेपणा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. वसंतराव देशपांडेंसारखे कुमार गंधर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ असणारे गायक त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी तत्पर असतात. अशा अवलियास पुल, रामूभैया दाते, वसंतराव देशपांडे आणि इतर अनेक क्षेत्रातले असंख्य स्नेही लाभले. आजारपणात साथ देणारे कुटुंबीय, आप्त लाभले. हे प्रेम, स्नेह दुतर्फी होते. पंडित मुकुल शिवपुत्र, कलापिनी कोमकली, सत्यशील देशपांडे आणि असे अनेक शिष्य त्यांनी घडवले. 

 शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात क्रांतिकारी नवनिर्मिती करणाऱ्या शिवपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली. 



Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

रुपयाचा प्रश्न

वाढता डॉलर की घसरता रुपया: एका किचकट प्रश्नाचा मागोवा  फोटो सौजन्य: गुगल  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, "रुपयाची किंमत घसरत नाहीए, तर डॉलर अधिकाधिक बळकट होत आहे." असे विधान केले. त्यावर विरोधकांकडून अर्थमंत्र्यांची अक्कल काढणारे, त्यांच्यावर स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी करण्यात आलेले असत्य, गोलमोल विधान अशी टीका केली जाईल. पण अर्थशास्त्रीयदृष्ट्या विचार करता लक्षात घेतले पाहिजे की हे विधान काळजीपूर्वक, सर्व समजून-उमजून केलेले आहे. ते कसे हे समजून घेण्यासाठी मुळातून एखाद्या देशाचे चलन, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमत, होणारे बदल याचे गणित, शास्त्र समजून घ्यावे लागेल. हा विषय किचकट आहे, क्लिष्ट आहे. पण रोमांचकारी आहे. सध्या उलगडत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व मुद्दा उलगडायचा असल्यामुळे चलन म्हणजे काय या मूलभूत मुद्द्यापासून सुरु न करता, थेट चलन विनिमय, आणि त्याचे दर याचा विचार करु.  चलन आणि विनिमय:  चलन विनिमय दर म्हणजे, एका चलनाची दुसऱ्या चालनाच्या तुलनेत होऊ शकणारी किंमत होय. ही किंमत ठरवण्याचे दोन मार्ग. एक, निश्चित दर आणि दुसरा...