Skip to main content

कुमार गंधर्व


  कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षापूर्वीच्याच कानांना 'आता अवधारिजो जी' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्ज लागला आणि त्यापूर्वी कोणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, "मारुजी भूलो ना म्हाने". अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारुजीमधल्या 'जी'वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अशा ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, 'सोहनीभटियार' आणि म्हणाला, "गेल्या काही वर्षात असे काही नवे राग आणि नव्या चिजा झाल्या आहेत." पु.ल. नावाच्या शब्दप्रभूने 'मंगल दिन आज' या गुण गाईन आवडी मधील व्यक्तिचित्रात पंडित कुमार गंधर्व या संगीतातील अलौकिक चमत्काराचे असे वर्णन केले आहे. 

पुल ज्याप्रमाणे त्या नव्या रागातील कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला असे वर्णन करतात, तो कोमल रिषभ लागला, म्हणजे काय झालं हे नीट सविस्तर समजावून सांगितल्याशिवाय काही मला कळणार नाही. पण एक गोष्ट नक्की की कुमार गंधर्वांचं गाणं काळजाला भिडतं. एक विलक्षण भावना मनात दाटते. ती भावना वर्णनातीत असते. आजतागायत ती तशीच आहे. त्यामुळेच कुमार गंधर्व या महापुरुषाबद्दल आपण भक्तिभाव यापलीकडे दुसऱ्या भावनेने पाहू शकत नाही. चिकित्सा वगैरे फार लांब राहिली. त्यांच्या कार्याचे आकलन जरी झाले तरी भरून पावलो. 

पुलंची त्या 'सोहनीभटियार' शी पहिली ओळख साक्षात कुमार गंधर्वांनी करुन दिली. माझी पहिली ओळख झाली राहुल देशपांडे यांच्या 'कुमार राग विलास' या कार्यक्रमात. इतर शास्त्रीय गायक गातात, किंवा स्वतः राहुल देशपांडेच गातात त्यापेक्षा हे वेगळं आहे. या मांडणीत एक विलक्षण आर्तता आहे. काळजात चलबिचल करणारी आर्तता आहे. ती सुरवात मनावर गारुड करणारी आहे. त्या दिवशी मनात ते "मारुजी भूलो ना म्हाने... अब घर तुम बिन राता डर लागे म्हाने" या शब्दांनी मनात विलक्षण खळबळ माजवली. त्याच धुंदीत एक निश्चय झाला की, साक्षात त्या गंधर्वांची गायकी ऐकली पाहिजे. 

आता श्रवण-दृश्यभक्ती साठी सर्वात मोठा आसरा म्हणजे युट्युब. त्या तंत्रज्ञानाच्या आश्रयाला गेलो. त्यानी निराश केलं नाही. कुमार गंधर्वांच्या गायनाचं भांडार खुलं झालं. सुरुवात अर्थातच सोहनीभटियार ने केली. पुन्हा तोच अनुभव. एकदा ऐकून समाधान होईना. त्या दिवशी तेवढा एकच राग किती वेळा ऐकला असेल माहिती नाही. युट्युब ही एक अशी अजब गुहा आहे की एकदा आत गेलात की जातच राहता. हे ऐकत असतानाच शेजारी रेकमेंडेशन मध्ये बिहाग होता. बिहाग हा मुळात आवडत्या रागांपैकी एक आहे. कुमार गंधर्व रचित बिहाग रागातील ती "मोरा मन.." बंदीश अशीच वेगळ्या जगात घेऊन जाते. एकामागून एक राग ऐकत गेलो. आणि एक गोष्ट परत ठसठशीतपणे जाणवली. ती म्हणजे प्रचलित शास्त्रीय संगीत गायकीपेक्षा ही गायकी काहीशी वेगळी आहे. आणि हेही तेवढ्याच तीव्रतेने जाणवलं की केवळ वगेळेपणाच्या अट्टाहासापायी हे केलेलं नाही. तर विचारपूर्वक झालेली ही कृती आहे. 


कुमार गंधर्वांचा आणखी एक महत्वपूर्ण आविष्कार म्हणजे भजन. त्यात सगुण-निर्गुण भजन सर्व आले. कुमारांच्या आवाजात जेव्हा 'उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला' हे कबीराचे शब्द येतात, तेव्हा त्या शब्दांतली भावना कुमार गंधर्वांपेक्षा थेट, काळजाला भिडेल अशी दुसरी कोणी मांडू शकणार नाही अशी खात्रीच पटते. कबीर, मीरा, तुलसीदासांच्या रचनांना कुमारांनी चढवलेला स्वरसाज असो की माळवी लोकगीते, माळवी लोकगीतांच्या धून हाती धरून नव्याने रचलेले राग असो हा गंधर्व क्षणोक्षणी अचंबित करत राहतो. शास्त्रीय संगीताचं आणि एकूणच संगीताचं सखोल चिंतन करणारा, ते पचवणारा आणि त्यातून नवनिर्मिती करणारा हा अवलिया कलावंत होता. 

कुमार गंधर्वांचं गाणं ऐन बहरात येत असताना त्यांना दुर्धर आजाराने गाठलं. अनेक वर्ष हा दैवी आवाज शांत होता. पण त्या शांततेच्या काळात हा अवलिया चिंतन करत होता. इतर अनेक आवाज, धून डोक्यात साठवीत होता. ते आजारपण जणू पुढल्या क्रांतिकारी नवनिमिर्तीसाठीच्या शांततेचा काळ ठरला. संगीतातला नवा विचार, नवी मांडणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असणारा हा कलावंत होता. तो विचार त्यांनी 'अनूप राग विलास' या श्रेष्ठ ग्रंथात मांडला आहे. तो विचार, मांडणीतली विविधता, नवेपणा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. वसंतराव देशपांडेंसारखे कुमार गंधर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ असणारे गायक त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी तत्पर असतात. अशा अवलियास पुल, रामूभैया दाते, वसंतराव देशपांडे आणि इतर अनेक क्षेत्रातले असंख्य स्नेही लाभले. आजारपणात साथ देणारे कुटुंबीय, आप्त लाभले. हे प्रेम, स्नेह दुतर्फी होते. पंडित मुकुल शिवपुत्र, कलापिनी कोमकली, सत्यशील देशपांडे आणि असे अनेक शिष्य त्यांनी घडवले. 

 शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात क्रांतिकारी नवनिर्मिती करणाऱ्या शिवपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली. 



Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...