Skip to main content

जागतिक आर्थिक घुसळणीत चमचमता तारा भारत

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४:

उत्तम आर्थिक विकासदर, संतुलित देशांतर्गत महागाई, स्थिर बाह्य क्षेत्र, स्थिर खासगी उपभोग, गुंतवणुकीला भक्कम मागणी या घटकांच्या आधारे दमदार आर्थिक विकास भारताने साधला आहे. 


फेब्रुवारीला लोक कान टवकारून, सज्ज होऊन बसलेले असतात. अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत, त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय बदल होणार, काय महागणार, काय स्वस्त होणार.  मध्यमवर्गीय, नोकरदार आयकर भरणारे, सवलत मिळते की करात वाढच होते हे जाणून घेण्यासाठी सर्वाधिक उत्सुक असतात. ते बरोबरच आहे. पण आताशा किंबहुना मोदी सरकार मध्ये सुरुवातीचे काही अर्थसंकल्प सोडले तर फार काही उलथापालथ घडवणारे निर्णय येत नाहीत. नुकताच आलेला निवडणुकोत्तर पूर्ण अर्थसंकल्पही याला अपवाद नाही. पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या गोष्टीकडे अर्थतज्ज्ञ, अभ्यासक वगळता इतरांचे फार लक्ष जात नाही, ती म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल. 

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार, सध्या डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन, हे मुख्यतः रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या माहिती-आकडेवारीच्या आधारे आर्थिक पाहणी अहवाल तयार करतात, तो केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे स्वाधीन करतात. या आर्थिक पाहणी अहवालात गेल्या वर्षीच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा, त्यापूर्वीच्या काळातील धोरणांमुळे गेल्या वर्षात काही परिणाम झाला का, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि पुढील काळात अर्थव्यवस्था कशी असेल, आव्हाने काय असतील यांवर टिप्पणी असते. हा अहवाल अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी संसदेच्या पटलावर ठेवणे आवश्यक असते, त्यानुसार दर वर्षी साधारण ३१ जानेवारीला ठेवला जातो, यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला होता. त्यामुळेच पूर्ण आर्थिक पाहणी अहवाल २२ जुलै रोजी आला आणि २३ जुलै रोजी अर्थसंकल्प. 

वर्ष २०२३-२४ च्या आर्थिक पाहणी अहवालात २०१४-२४ या दशकाचा, दशकातील बदलांचा आढावा घेत मांडणी केली आहे. त्यातील वैशिष्ट्ये पुढे येतीलच, सुरवात प्राथमिक आकडेवारी पासून करणे आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ८.२%, तर महागाई दर ५.४%, सकल मूल्यवर्धन ७.२% आणि कर संकलनात १९.१% निव्वळ वाढ, चालू खात्यातील तूट नीचांकी ०.७% वर आली आहे. या आकडेवारीचे सार शब्दांत वर्णन करायचे तर उत्तम आर्थिक विकासदर, संतुलित देशांतर्गत महागाई, स्थिर बाह्य क्षेत्र, स्थिर खासगी उपभोग, गुंतवणुकीला भक्कम मागणी या घटकांच्या आधारे दमदार आर्थिक विकास भारताने साधला आहे. 

ही दमदार कामगिरी गेल्या दशकभराच्या धोरणात्मक पायाभरणीचा परिपाक आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक मूलभूत धोरणात्मक निर्णय घेतले त्यात उद्योग, वित्त क्षेत्र आमूलाग्र बदलणारी धोरणे होती त्याचबरोबर अंत्योदय सूत्रानुसार आखलेली धोरणे होती. दिवाळखोरी आणि नादारी संहिता, वस्तू व सेवा कर, रेरा सारखे वित्त, उद्योग क्षेत्र ढवळून काढणारे हे निर्णय आहेत. जनधन, युपीआय, मुद्रा, स्टॅन्ड अप, सारखी अंत्योदय सूत्रानुसार राबवलेली धोरणे योजना आहेत. सामाजिक क्षेत्रात उज्ज्वला, उजाला, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, जल जीवन मिशन, आयुषमान भारत, आवास योजना अशा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणाऱ्या, अंत्योदय सुत्रानुसारच्या योजना आहेत. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजना, कृषी क्षेत्रासाठी कृषी सिंचाई, e NAM, आणि पायाभूत सुविधा विकासावर प्रचंड भर दिला गेला आहे. 

सामाजिक विकास, सामाजिक न्याय यासाठी होणाऱ्या खर्चात देखील गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. सामाजिक सुविधा यावर होणारा खर्च जीडीपीच्या ७.९% वर पोचला आहे, आरोग्य सुविधेवरील खर्च १.९% वर पोचला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुषमान भारत योजनेने कनिष्ठ मध्यमवर्ग, गरिबांच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन आणले आहे. मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गरीब यांना आपल्या आर्थिक स्थितीच्या एक किंवा दोन स्तर खाली आणण्यात आरोग्यावरील, विशेषतः मोठ्या, गंभीर आजारांवरील उपचाराचा खिशातून करावा लागणारा खर्च हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. आयुषमान भारतमुळे ही शक्यता खूप कमी झाली आणि त्यामुळे वाचलेले उत्पन्न इतर उत्पादक घटकांकडे वळून कौटुंबिक उन्नतीचा वेग वाढला असे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे. 

दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे वित्त क्षेत्रातील 'ट्वीन बॅलन्स शीट प्रॉब्लेम' सुटायला खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. गेल्या तीन वर्षात ३३,३९४ कॉर्पोरेट कंपन्या ज्यात विविध वित्तसंस्थांचे १३.९ लाख कोटी रुपये अडकले होते अशी प्रकरणे निकालात निघाली आहेत. बँका सुस्थितीत आल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून होणारा वित्तपुरवठा १६४.३ लाख कोटींवर गेला आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजनांमधून १.२८ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. खासगी गुंतवणुकीला चालना, MSME चा विस्तार, आणि कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. उद्योग वृद्धी दर ९.५% वर गेला आहे. हे होत असताना मात्र एक महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे की वित्तपुरवठ्यात बँकांचा दबदबा कमी होत भांडवल बाजाराचा सहभाग वाढत आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय तरतुदीत दिसून आले.  फ्युचर्स-ऑप्शन ट्रेडिंग, समभाग, म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून फिरणारा पैसा काही प्रमाणात का होईना पुन्हा बँकिंग व्यवस्थेत यावा अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

या सर्व सकारात्मक वातावरणात काही चिंताही यात व्यक्त करण्यात आल्या आहेत. जागतिक पातळीवर, विशेषतः विकसित देशात व्याजदर वाढीमुळे भारतात देखील व्याजदर वाढ झाली. परिणामी वित्तुभारणीचा खर्च वाढला, तरीही भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीवर झाला नाही. भांडवली बाजारात देखील झाला नाही कारण देशांतर्गत पैसे म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक माध्यमातून गुंतवला गेला. हरित ऊर्जा क्षेत्रात भारताने दणदणीत कामगिरी केली आहे. त्यासाठी गुंतवणूक केली आहे. हे करत असताना खासगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीवर भर, रोजगार निर्मितीवर भर देत वेगवान आर्थिक वृद्धीचा दर राखता येणार आहे. 

आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प दोन्हीही आता आलेले आहेत. अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात चर्चा, वादविवाद झाले, आणखी काही दिवस होत राहतील. पण आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प एकत्रितरित्या पाहिले, अभ्यासले तर गेल्या दशकातील धोरणात्मक पाया, त्यावर उभारलेली आजच्या वेगवान वृद्धीची इमारत आणि विकसित भारताची पायाभरणी अशी सलगता प्रतीत होते. उच्च विकास दर, नियंत्रित महागाई, जागतिक व्यापारात वाढती भागीदारी, वाढती गुंतवणूक, याच बरोबर सामाजिक सुरक्षा केलेल्या खर्चासह राखलेली शिस्त यातून भारत जागतिक आर्थिक घुसळणीतला चमचमता तारा हे बिरुद राखत विकसित भारताकडे वाटचाल करणार हे नक्की. 

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरुण भारत




 

Comments

Popular posts from this blog

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...