Skip to main content

Savai Gandharv Mahotsav.



           गुलाबी थंडी. संध्याकाळची वेळ. वातावरणात  वेगळीच धुंदी होती. हजारोंचा जनसमुदाय कानात प्राण आणून बसलेला. एकाच ध्यासासाठी. स्वरांची आतषबाजी कानात साठवण्यासाठी. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी. चार-पाच दिवस चालणारा हा महोत्सव स्वरांची पर्वणी असते.  महोत्सवाला आबालवृद्धांची अलोट गर्दी असते. आमच्यासारख्या तरुणाईचीही संख्या लक्षणीय असते. तिथे संगीतातले जाणकार येतात त्याचप्रमाणे आमच्यासारखे 'अ'जाणकारही येतात. शास्त्रीय संगीतातलं रागाचं नाव रागात अस्ताई, अंतरा वगैरे असतात यापलीकडे काहीही माहिती नसणारे आमच्यासारखे 'अ'जाणकार तिथे येतात ते फक्त गायकीतला गोडवा, ती नजाकत ऐकण्यासाठी.  शास्त्रीय घटक कळत नसले तरी ते ऐकायला छान वाटतात आणि डोक्यात काहीतरी स्ट्राईक होतं. बस्स!! एवढ्याचसाठी आम्ही तिथे जातो. यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर-डॉ.  अश्विनी भिडे-देशपांडे यांची 'जसरंगी' मैफल, उस्ताद निशात खान यांची सतार आणि त्याला पंडित आनिन्दो चात्तार्जी यांची तबल्यावर साथ. आणि संगीत मार्तंड पंडित जसराज यांचा स्वरसाज. ही पर्वणी सोडणं शक्यच नव्हतं.
               जसरंगी मैफिलीत मूर्छना प्रकारचे सादरीकरण पंडित अभ्यंकर आणि पंडिता भिडे-देशपांडेनी केले. पंडिता अश्विनिजीनी राग अभोगी आणि पंडित अभ्यंकरांनी राग गायले. एकाच मंचावर  भिन्न राग  मांडले. सारेगम पर्यंत राग अभोगी तर मध्यमाला षड्ज मानून कलावती राग पेश केला. (म्हणजे नक्की  झालं ते कळलंच नाही) पण संजीव अभ्यंकरांचा गोड आवाज, भिडे-देशपांडेंचा आवाज, त्या दाणेदार ताना ऐकायला मजा येत होती. त्यानंतरचा राग दुर्गा आणि रागांचा राजा भूप अशीच झिंग आणून  गेला. एव्हाना थंडी वाढायला होती. या जसरंगी मैफिलीनंतर उस्ताद निशात खान आणि पंडित आनिन्दो याचं आगमन झालं. त्यांची सतार ऐकायला मी अतिशय उत्सुक होतो. सतार हे माझं आवडतं वाद्य. तरीसुद्धा प्रत्यक्ष सतार कधीच ऐकली नव्हती. आता योग आला होता.
             उस्ताद निशात खान यांनी यमन वाजवला. यमन राग हा एक अवघड राग आहे. आणि हिंदी सिनेमांमध्ये बरीच गाणी या रागाच्या सुरावटीवर  बेतलेली आहेत. इतकीच आम्हाला या रागाची माहिती. आणि तसाही माहिती करून घ्यायची इच्छा नव्हती. निदान त्या वेळी तरी. कानात प्राण आणून बसलो होतो. यमन रागाची आलापी सुरु होती. कुठल्याही शास्त्रीय वाद्याच्या मैफिलीत तबल्याची साथ सुरु होण्यापूर्वी जी काही सुरावट छेडली जाते त्याला आलापी म्हणतात, यापलीकडे 'आलापी' विषयी काहीही माहिती नव्हतं.  गमक आणि मींड यांनी बढत सुंदर जमली होती. अनेक आरोही-अवरोही वर्ण, खटक्या, मुरक्या, लांगडाट, जमजमा सुंथ यांची भरपूर रेलचेल होती असं एका जाणकाराने सांगितल्यामुळे कळलं होतं. (हे सगळं कधी येउन गेलं ते समजलंच नव्हतं )बाकी हे सोडलं तर, सतारीवरची ती करामत डोक्यात फिट्ट बसली होती. पंडित अनिन्दो यांची तबल्यावर उत्तम साथसंगत होती. त्या थंडीत हे दोन कलाकार बोटांमध्ये वीज संचारल्यागत सतार-तबल्यावर करामती होते. आणि मग मंचावर आगमन झालं संगीत मार्तंड पंडित जसराज याचं.
               या जसराज मैफिलीचा आनंद दुहेरी होता. पंडित जसराज यांच्या स्वरसाथीला पंडित संजीव अभ्यंकर होते. द्रोणाचार्य आणि अर्जुनच जणू. अर्जुन आपली कला दाखवून गेला होता आणि आता द्रोणाचार्य आपली आयुधं सरसावून आले होते. अभूतपूर्व योग होता तो. पंडितजींनी राग पुरिया सदर केला. 'अब मोरी रखो लाज' ही  विलंबित झपतालातली सुरु झाली. आणि शेवट मध्यलय त्रितालातली 'शामकुंवर मोरे घर आये' सादर केली. हीच बंदिश रेकोर्ड केलेली ऐकली आहे पण प्रत्यक्षात ती ऐकताना काही निराळीच अनुभूती येत होती. या पहिल्या दिवशीच्या अभोगी-कलावती, दुर्गा-भूप, यमन, पुरिया या रागांच्या मैफिलीमुळे सुरांचा अमृतकुंभच जणू उघडला होता.डोळे-कान तृप्त करणारा हा अनुभव संपूच नये असं वाटत होतं. ती मैफिल संपली तरी ती स्वरांची धुंदी पुढलं आयुष्यभर तरी उतरेल असं वाटत नाही.

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...