Skip to main content

सुहेलदेव: - अमिश त्रिपाठी


"इंडियाज लिटररी पॉपस्टार" असे अमीश त्रिपाठी यांचे यथार्थ वर्णन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले आहे. या वर्णनास साजेशी अशीच अमीश यांची लेखन कारकीर्द आहे. पशुपती महादेवाच्या कथेकडे शक्य तितक्या मानवी दृष्टिकोनातून बघत त्यांनी कादंबरीस्वरूपात केलेली मांडणी 'शिव ट्रायोलॉजी' मधून पुढे आली आहे. रामायणाकडे देखील मानवी दृष्टिकोनातून बघत, त्यातील चमत्कृतीपूर्ण आश्चर्यांना फाटा देत, तीन प्रमुख पात्रे, राम-सीता आणि रावण यांच्या दृष्टीने तीन भागात कादंबरीमय रामायण त्यांनी मांडले आहे. याच मालिकेत त्यांचे पुढची कादंबरी आली आहे. ज्यात त्यांनी मध्ययुगीन भारतातील पराक्रमी परंतु काहीशा विस्मरणात गेलेल्या राजाची गाथा त्यांनी मांडली आहे. 

एक असा राजा ज्याने इस्लामच्या ध्वजाखाली अमानुष आक्रमणे करणाऱ्या तुर्कांच्या सैन्याचा सपाटून पराभव केला. असा राजा ज्याच्या पराक्रमामुळे पुढच्या दीडशे वर्षात तुर्की आक्रमकांचे भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही. असा राजा ज्याने शक्य तेवढ्या सर्व राज्यांना, राजघराण्यांना एकत्र करून, सामूहिक लढा दिला आणि भारताच्या इतिहासात अजरामर झाला. त्या राजाला विसमरणात ढकलण्याचे, किंवा त्याच्या जात, प्रदेशापुरते सीमित करण्याचे पाप आपल्याकडून घडले. यापुढे तसे होऊ नये. भारताच्या इतिहासातील अशा पराक्रमी वीरांची गाथा कायम गायली गेली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणता येईल अशी ही अमीश यांची कादंबरीमय गाथा म्हणजे लिजंड ऑफ सुहेलदेव!

ही गाथा सुरु होते गझनीच्या महमूदाच्या सोमनाथवरील स्वारीपासून. भारतीयांसाठी पवित्र आणि महत्वपूर्ण असलेल्या सोमनाथच्या मंदीरावर अनेक वेळा स्वारी झाली. मंदिर अनेक वेळा उध्वस्त करण्यात आले ते केवळ संपत्तीसाठी नाही. त्यामागे निश्चित धार्मिक विचार होता. कमअस्सल मूर्तिपूजक आणि त्यांच्या मूर्तींना अस्तित्वात राहण्याचा काहीही अधिकार नाही यावर ठाम श्रद्धा असणारे मूलतत्त्ववादी मुस्लिम तेव्हा होते आजही आहेत. त्यात सुफी तत्वज्ञान मानणारे आणि इतर काही व्यक्तिविशेष हे अपवाद आहेत. भारतीयांना, हिंदूंना प्रिय असणाऱ्या मंदिरांवर, श्रद्धास्थानांवर हल्ला करून त्यांची लढण्याची, प्रतिकार करण्याची क्षमताच मारून टाकण्याची योजना वापरण्यात येत होती. 

सोमनाथवरील स्वारीचा प्रतिकार करण्यासाठी देशभरातून सैन्याच्या तुकड्या गेल्या होत्या. त्यात श्रावस्तीचा युवराज मल्लदेवाचा देखील समावेश होता. सोमनाथाची सुरक्षा करत असताना लढाईत मल्लदेव धारातीर्थी पडतात आणि युवराजपदासोबतच एक मोठी जबाबदारी मल्लदेवाचा धाकटा भाऊ सुहेलदेवावर येऊन पडते. सुहेलदेव एक पराक्रमी, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्याकांक्षी तरुण आहे. त्याने भारताच्या सीमेपलीकडून सातत्याने स्वाऱ्या करणाऱ्यांचा धोका ओळखला आहे. त्या आक्रमणांना स्वाऱ्या वेळीच पायबंद घालून मातृभूमीचे रक्षण करण्याची गरज त्याने वेळीच ओळखली आहे. त्यासाठी भारतातील विविध राजांची आणि राज्यांची मोट एकत्र बांधण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. पण जातींच्या क्षुद्र अभिमानापायी एकत्र येण्यात अडथळे आहेत. या सर्वांवर मात करत उत्तर भारतातील २१ प्रमुख राज्यांना आणि दक्षिणेतील मातबर चोळ साम्राज्याशी संपर्क करून त्यांचेही साहाय्य कसे मिळवतो हे मुळातून वाचण्यासारखे आहे. आक्रमकांची चाल ओळखून त्यांची चाल उलटवून बहराईच येथे गझनीचा सेनापती सालार मकसूदचा पराभव केला याची गाथा अमीश यांनी मांडली आहे. 

भारताला जशी पराक्रमी वीरांची परंपरा आहे तशीच शत्रूला चूड दाखवून घरात घेऊन संपूर्ण घराचीच वाताहत घडवणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांची देखील देदीप्यमान परंपरा आहे. क्षुद्र सामाजिक मानापमानांसाठी, स्थानिक राजकीय हिशेब चुकते करण्याच्या नादात शत्रूशी हातमिळवणी करण्याची आणि त्यातून शत्रूने आपल्या भूमीवरच ताबा घेतल्याची परंपरा आहे. ती परंपरा मौर्यपूर्व काळात अलेक्झांडरच्या स्वारीपासून ते इंग्रजांपर्यंत आणि आता प्रामुख्याने पाक-चीन पुरस्कृत पंचमस्तंभी कारवायांपर्यंत कायम आहे. या परंपरेतील काही उदाहरणे या गाथेत आढळतात. सुहेलदेवाचा पराक्रम आणि सर्वांना एकत्र करू शकण्याच्या क्षमतेमुळे गझनीच्या महमूदचा सेनापती सालार मकसूदचा पराभव झाला. त्यामुळे पुढली दीडशे वर्षं भारतावर मोठे आक्रमण झाले नाही. पुढे भारत पुन्हा जातीच्या अभिमानापायी फुटला आणि क्षुद्र स्वार्थापायी पुन्हा शत्रूला चूड लावून घरात घेतले तेव्हा पृथ्वीराजाचा पराभव झाला. भारत गुलामीच्या टाचेखाली गेला. या चुका टाळण्यासाठी, भारताला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सुहेलदेवासारख्या वीर पराक्रमींच्या गाथा सतत गायल्या, ऐकल्या गेल्या पाहिजेत. इतिहासाच्या उजळणीमुळेच भविष्यातल्या भक्कमतेची पायाभरणी होते. 

पहिल्या ओळीपासूनच ही कादंबरी वाचकाचे लक्ष वेधून घेते. कथानकावर खिळवून ठेवते. श्रावस्ती, कनौज, गझनी ते चोळांची राजधानी गंगकोंडचोलपूरम असा कथानकाचा मोठा पट आहे. तत्कालीन समाज, राजकीय परिस्थिती यांचे यथार्थ चित्रण कादंबरीत करण्यात आले आहे. उदाहरणार्थ भाषा. संपूर्ण भारतात विविध प्रदेशात विविध भाषा बोलल्या जात. पण संपूर्ण भारतात किमान प्रमुख राजकीय व्यक्ती, लोकांमध्ये होणार संवाद संस्कृतद्वारे होत असे. हे चित्र आजच्या भारताशी मिळतेजुळते आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठलीही भाषा बोलली जात असो, बहुतांश भागात हिंदीद्वारे किंवा इंग्रजीद्वारे संवाद सुलभ होतो. 

भारतीय इतिहासाच्या पानापानांत अशा पराक्रमाच्या गाथा आहेत. इतके प्रयत्न करूनही इस्लामी आक्रमकांना भारतावर संपूर्ण नियंत्रण कधीही मिळवता आले नाही. इस्लामी आक्रमण उत्तरेत यशस्वी होत होते त्यावेळी दक्षिणेत यादव, होयसळ, काकतीय इत्यादी घराणी पराक्रम गाजवत होती. भारतीयत्वाची पताका फडकती ठेवत होती. या राजवटी जेव्हा इस्लामी आक्रमणापुढे पराभूत झाल्या तरी त्याच वेळी पूर्वेकडे आसाममध्ये अहोम सत्ता उदयाला येत होती. यादव, काकतीय आणि होयसळ साम्राज्य लयाला गेल्यानंतर अवघ्या काही वर्षात विजयनगरचे साम्राज्य उभे राहिले. विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर अवघ्या शंभर वर्षांच्या आत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आकार घेऊ लागले. म्हणजेच देशाच्या कुठल्या न कुठल्या भागात भारतीय राज्य, पराक्रम कायमच उभा राहत आला आहे. या पराक्रमाच्या गाथा राष्ट्रीय स्तरावर गाण्याची सुरुवात राणा प्रतापापासून सुरु होऊन शिवाजी, संभाजी, बाजीराव असे करत अनेक विस्मरणात गेलेल्या वीरांची गाथा समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अधिकाधिक पुढे येतच राहाव्यात. तूर्तास श्रावस्तीच्या राजाची, सुहेलदेवाची गाथा नक्की वाचावी. 
  

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...