Skip to main content

सुहेलदेव: - अमिश त्रिपाठी


"इंडियाज लिटररी पॉपस्टार" असे अमीश त्रिपाठी यांचे यथार्थ वर्णन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले आहे. या वर्णनास साजेशी अशीच अमीश यांची लेखन कारकीर्द आहे. पशुपती महादेवाच्या कथेकडे शक्य तितक्या मानवी दृष्टिकोनातून बघत त्यांनी कादंबरीस्वरूपात केलेली मांडणी 'शिव ट्रायोलॉजी' मधून पुढे आली आहे. रामायणाकडे देखील मानवी दृष्टिकोनातून बघत, त्यातील चमत्कृतीपूर्ण आश्चर्यांना फाटा देत, तीन प्रमुख पात्रे, राम-सीता आणि रावण यांच्या दृष्टीने तीन भागात कादंबरीमय रामायण त्यांनी मांडले आहे. याच मालिकेत त्यांचे पुढची कादंबरी आली आहे. ज्यात त्यांनी मध्ययुगीन भारतातील पराक्रमी परंतु काहीशा विस्मरणात गेलेल्या राजाची गाथा त्यांनी मांडली आहे. 

एक असा राजा ज्याने इस्लामच्या ध्वजाखाली अमानुष आक्रमणे करणाऱ्या तुर्कांच्या सैन्याचा सपाटून पराभव केला. असा राजा ज्याच्या पराक्रमामुळे पुढच्या दीडशे वर्षात तुर्की आक्रमकांचे भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही. असा राजा ज्याने शक्य तेवढ्या सर्व राज्यांना, राजघराण्यांना एकत्र करून, सामूहिक लढा दिला आणि भारताच्या इतिहासात अजरामर झाला. त्या राजाला विसमरणात ढकलण्याचे, किंवा त्याच्या जात, प्रदेशापुरते सीमित करण्याचे पाप आपल्याकडून घडले. यापुढे तसे होऊ नये. भारताच्या इतिहासातील अशा पराक्रमी वीरांची गाथा कायम गायली गेली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणता येईल अशी ही अमीश यांची कादंबरीमय गाथा म्हणजे लिजंड ऑफ सुहेलदेव!

ही गाथा सुरु होते गझनीच्या महमूदाच्या सोमनाथवरील स्वारीपासून. भारतीयांसाठी पवित्र आणि महत्वपूर्ण असलेल्या सोमनाथच्या मंदीरावर अनेक वेळा स्वारी झाली. मंदिर अनेक वेळा उध्वस्त करण्यात आले ते केवळ संपत्तीसाठी नाही. त्यामागे निश्चित धार्मिक विचार होता. कमअस्सल मूर्तिपूजक आणि त्यांच्या मूर्तींना अस्तित्वात राहण्याचा काहीही अधिकार नाही यावर ठाम श्रद्धा असणारे मूलतत्त्ववादी मुस्लिम तेव्हा होते आजही आहेत. त्यात सुफी तत्वज्ञान मानणारे आणि इतर काही व्यक्तिविशेष हे अपवाद आहेत. भारतीयांना, हिंदूंना प्रिय असणाऱ्या मंदिरांवर, श्रद्धास्थानांवर हल्ला करून त्यांची लढण्याची, प्रतिकार करण्याची क्षमताच मारून टाकण्याची योजना वापरण्यात येत होती. 

सोमनाथवरील स्वारीचा प्रतिकार करण्यासाठी देशभरातून सैन्याच्या तुकड्या गेल्या होत्या. त्यात श्रावस्तीचा युवराज मल्लदेवाचा देखील समावेश होता. सोमनाथाची सुरक्षा करत असताना लढाईत मल्लदेव धारातीर्थी पडतात आणि युवराजपदासोबतच एक मोठी जबाबदारी मल्लदेवाचा धाकटा भाऊ सुहेलदेवावर येऊन पडते. सुहेलदेव एक पराक्रमी, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्याकांक्षी तरुण आहे. त्याने भारताच्या सीमेपलीकडून सातत्याने स्वाऱ्या करणाऱ्यांचा धोका ओळखला आहे. त्या आक्रमणांना स्वाऱ्या वेळीच पायबंद घालून मातृभूमीचे रक्षण करण्याची गरज त्याने वेळीच ओळखली आहे. त्यासाठी भारतातील विविध राजांची आणि राज्यांची मोट एकत्र बांधण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. पण जातींच्या क्षुद्र अभिमानापायी एकत्र येण्यात अडथळे आहेत. या सर्वांवर मात करत उत्तर भारतातील २१ प्रमुख राज्यांना आणि दक्षिणेतील मातबर चोळ साम्राज्याशी संपर्क करून त्यांचेही साहाय्य कसे मिळवतो हे मुळातून वाचण्यासारखे आहे. आक्रमकांची चाल ओळखून त्यांची चाल उलटवून बहराईच येथे गझनीचा सेनापती सालार मकसूदचा पराभव केला याची गाथा अमीश यांनी मांडली आहे. 

भारताला जशी पराक्रमी वीरांची परंपरा आहे तशीच शत्रूला चूड दाखवून घरात घेऊन संपूर्ण घराचीच वाताहत घडवणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांची देखील देदीप्यमान परंपरा आहे. क्षुद्र सामाजिक मानापमानांसाठी, स्थानिक राजकीय हिशेब चुकते करण्याच्या नादात शत्रूशी हातमिळवणी करण्याची आणि त्यातून शत्रूने आपल्या भूमीवरच ताबा घेतल्याची परंपरा आहे. ती परंपरा मौर्यपूर्व काळात अलेक्झांडरच्या स्वारीपासून ते इंग्रजांपर्यंत आणि आता प्रामुख्याने पाक-चीन पुरस्कृत पंचमस्तंभी कारवायांपर्यंत कायम आहे. या परंपरेतील काही उदाहरणे या गाथेत आढळतात. सुहेलदेवाचा पराक्रम आणि सर्वांना एकत्र करू शकण्याच्या क्षमतेमुळे गझनीच्या महमूदचा सेनापती सालार मकसूदचा पराभव झाला. त्यामुळे पुढली दीडशे वर्षं भारतावर मोठे आक्रमण झाले नाही. पुढे भारत पुन्हा जातीच्या अभिमानापायी फुटला आणि क्षुद्र स्वार्थापायी पुन्हा शत्रूला चूड लावून घरात घेतले तेव्हा पृथ्वीराजाचा पराभव झाला. भारत गुलामीच्या टाचेखाली गेला. या चुका टाळण्यासाठी, भारताला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सुहेलदेवासारख्या वीर पराक्रमींच्या गाथा सतत गायल्या, ऐकल्या गेल्या पाहिजेत. इतिहासाच्या उजळणीमुळेच भविष्यातल्या भक्कमतेची पायाभरणी होते. 

पहिल्या ओळीपासूनच ही कादंबरी वाचकाचे लक्ष वेधून घेते. कथानकावर खिळवून ठेवते. श्रावस्ती, कनौज, गझनी ते चोळांची राजधानी गंगकोंडचोलपूरम असा कथानकाचा मोठा पट आहे. तत्कालीन समाज, राजकीय परिस्थिती यांचे यथार्थ चित्रण कादंबरीत करण्यात आले आहे. उदाहरणार्थ भाषा. संपूर्ण भारतात विविध प्रदेशात विविध भाषा बोलल्या जात. पण संपूर्ण भारतात किमान प्रमुख राजकीय व्यक्ती, लोकांमध्ये होणार संवाद संस्कृतद्वारे होत असे. हे चित्र आजच्या भारताशी मिळतेजुळते आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठलीही भाषा बोलली जात असो, बहुतांश भागात हिंदीद्वारे किंवा इंग्रजीद्वारे संवाद सुलभ होतो. 

भारतीय इतिहासाच्या पानापानांत अशा पराक्रमाच्या गाथा आहेत. इतके प्रयत्न करूनही इस्लामी आक्रमकांना भारतावर संपूर्ण नियंत्रण कधीही मिळवता आले नाही. इस्लामी आक्रमण उत्तरेत यशस्वी होत होते त्यावेळी दक्षिणेत यादव, होयसळ, काकतीय इत्यादी घराणी पराक्रम गाजवत होती. भारतीयत्वाची पताका फडकती ठेवत होती. या राजवटी जेव्हा इस्लामी आक्रमणापुढे पराभूत झाल्या तरी त्याच वेळी पूर्वेकडे आसाममध्ये अहोम सत्ता उदयाला येत होती. यादव, काकतीय आणि होयसळ साम्राज्य लयाला गेल्यानंतर अवघ्या काही वर्षात विजयनगरचे साम्राज्य उभे राहिले. विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर अवघ्या शंभर वर्षांच्या आत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आकार घेऊ लागले. म्हणजेच देशाच्या कुठल्या न कुठल्या भागात भारतीय राज्य, पराक्रम कायमच उभा राहत आला आहे. या पराक्रमाच्या गाथा राष्ट्रीय स्तरावर गाण्याची सुरुवात राणा प्रतापापासून सुरु होऊन शिवाजी, संभाजी, बाजीराव असे करत अनेक विस्मरणात गेलेल्या वीरांची गाथा समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अधिकाधिक पुढे येतच राहाव्यात. तूर्तास श्रावस्तीच्या राजाची, सुहेलदेवाची गाथा नक्की वाचावी. 
  

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...