Skip to main content

गांधार ते तालिबान: The Afghan Connection


अफगाणिस्तान हे कोडं आहे. सध्याच्या काळात साम्राज्यांची दफनभूमी अशी प्रमुख ओळख कायम झाली आहे. पण प्राचीन काळात याच  भूभागात संस्कृतीचे मळे फुलले. पश्चिम आणि उत्तरेकडून भारतावर झालेली सर्व आक्रमणे गांधार भूमीतूनच झाली. कारण पश्चिम आणि उत्तरेकडून भारतात प्रवेश करण्यासाठी दोनच जमिनी वाटा होत्या. एक खैबर आणि दुसरी बोलन खिंड. समुद्री मार्ग खुले झाले, भूराजकीय गणिते बदलली तरी या भागाचं महत्त्व काही कमी झालं नाही. 

भारत आणि अफगाणिस्तान ही पूर्वापार चालत आलेली एक अतूट बंधनाची नाळ आहे. तीच डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या पुस्तकात उलगडली आहे.  

भारतीय उपखंड आणि त्याच्या लगत असणाऱ्या भूभागात जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक उदयाला आली, वाढली. काही बदल होत तीच संस्कृती आजही या उपखंडात टिकून आहे. मोठे बदल झाले ते सीमावर्ती भागात म्हणजेच, वायव्य भागात. इस्लामिक आक्रमणानंतर झालेले बदल वरवरचे आहेत हे बलोच स्वातंत्र्यकांक्षीच्या, "आम्ही पाकिस्तानी गेल्या ५०-६० वर्षांपासून आहोत, मुस्लिम १४०० वर्षांपासून पण गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही बलोच आहोत" वाक्यातून स्पष्ट होते. 

द अफगाण कनेक्शन या पुस्तकात डॉ. पाठक अफगाणिस्तानचा प्रागैतिहासिक काळापासून धांडोळा घेण्यास सुरवात करतात. त्या काळाचे काही पुरावे त्या भूमीत आहेत त्यांचे यथायोग्य दाखले देत एका महत्त्वपूर्ण घटनेकडे येतात. 

सिंधू संस्कृती म्हणून जी ओळखल्या जात होती, ती आता अधिक अभ्यासांती सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणून ओळखली जात आहे. अधिकाधिक अभ्यासातून हेदेखील स्पष्ट होत आहे की त्या संस्कृतीचा काळ आजवर समजत होतो त्यापेक्षा अधिकच जुना आहे. तर सिंधू-सरस्वती संस्कृतीला समांतर काही ठिकाणे, गांधार भूमीत आढळून आली आहेत. ऋग्वेदात दाशराज्ञ युद्ध ही एक फार महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. त्या युद्धात देखील गांधार भूमीतून गेलेल्या तत्कालीन टोळ्यांचा पुरावा डॉ. मांडतात. 

वेद वाङ्मय आणि प्राचीन पर्शिअन पवित्र ग्रंथ अवेस्ता मध्ये एका सामाजिक दुभंगाचा संदर्भ आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीतील शहरे लयाला जात असताना मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यातील एक शाखा पश्चिमेकडे गेली. त्यांनी अग्निपूजेवर आधारित असा पारशी धर्म वाढवत नेला. दुसरी शाखा पूर्वेकडे येऊन गंगा खोऱ्यात विसावली आणि यज्ञ संस्कृतीवर आधारित सनातन धर्म पुढे गेला. या सर्व घटनेचा, त्याच्या शक्यतांचा, त्यांच्या आपसातील संबंधांचा यथायोग्य धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. 

महाभारत, गांधार आणि भारतीय युद्ध हा भारताच्या इतिहासातील एक स्थित्यंतर घडवून आणणारा टप्पा आहे. केवळ महाकाव्यांतील लिखित पुरावेच नाही तर पुरातत्त्वीय पुरावे देखील आता समोर येत आहेत. त्यातून हा अन्योन्य संबंध अधिकाधिक ठळक होत आहे. याचाही यथायोग्य धांडोळा घेण्यात आला आहे. 

पुढे ग्रीक आक्रमण, त्यांना भारताच्या भूमीत झालेला कडवा प्रतिकार आणि मध्य आशियाच्या भूमीत स्थापन झालेली ग्रीक क्षत्रपांची राज्ये त्यातून पुढे आलेल्या अनेक परंपरा यांचा अभ्यास डॉ. पाठक यांनी मांडला आहे. उत्तरेकडून आलेली शक-कुशाणांची आक्रमणे, त्यांचा विस्तार आणि त्यासोबत घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे अफगाण भूमीत बौद्ध मताचा प्रचार-प्रसार. 

हे बौद्ध मत एका निराळ्या, सुंदर अशा गांधार कलाशाखेला वृद्धिंगत करुन गेले. भारतीय मूर्तिशास्त्र, कलाकारी यांच्या विकासाची एक शाखा गांधारात समृद्ध झाली. या कलाकारीचे सर्वोच्च टोक म्हणता येतील अशा बामियानच्या बुद्धमूर्ती.... होत्या. 

पुढचा इस्लामिक आक्रमणे, अफगाण भूमीचे बौद्ध मतातून संपूर्ण इस्लामीकरण हा इतिहास आहे. जयपाळ आणि अनंगपालांची राजपूत हिंदू राज्ये ही या भागातील शेवटची हिंदू राज्ये. इस्लामी आक्रमकांनी केलेल्या हिंदू-बौद्धांच्या कत्तली, त्यांची गोठलेली कलेवरे यातूनच त्या पर्वतरांगेला 'हिंदुकुश' हे नाव पडले. मध्ययुगीन अफगाण भूमीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. गजनी-घोरीची आक्रमणे यापासून सुरु झालेला सिलसिला अब्दाली पाशी येऊन थांबला. तिथून पुढला ग्रेट गेमच्या वाटेने तालिबान पर्यंतचा इतिहास डॉ. पाठक यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या छोटेखानी पण आशयाने भरपूर असलेल्या पुस्तकात वाचायलाच हवा. 


पूर्वप्रसिद्धी: 


Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...