Skip to main content

राजगड

                                     

                   
                 पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलैचा दुसरा आठवडा आला तरी म्हणावा तितका पाउस पडलेला नव्हता. सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. नुसतं घरात स्वस्थ बसून राहवत नव्हतं. दऱ्या-खोऱ्यात फिरण्याचे दिवस हे… " घरात काय बसून राहायचं? " अशा मनस्थितीतून जात असताना अचानक सर्वांच्या मनात आलं. चला राजगडावर. राजगड. १६४७ पासून सुरु झालेल्या  साम्राज्याच्या निर्मितीतील महत्वाचे साक्षीदार असणारे महाराजांचे आवडते किल्ले म्हणजे तोरणा, पुरंदर, रोहीडा, प्रतापगड आणि राजगड. 'गडांचा राजा, राजांचा गड' असं यथार्थ वर्णन राजगडाचं करण्यात येतं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. नजर ठरत नाही अशा उत्तुंग उंचीवर असणारं जणू गरुडाचं घरट. बोलावं, ऐकावं, वाचावं तितकं कमी आहे असा हा राजगड. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. देवाच्या दयेनं दिसलाच सूर्योदय  तर तो राजगडच्या पायथ्यालाच  पहायचा अशा निर्धाराने गाड्या  पिटाळत होतो. 
                रस्त्याच्या दुतर्फा हिरवा गालीचा पसरलेला होता. ढगाळ वातावरण. तासाभरात नसरापूर मार्गे गुंजवणे गावात पोचलो. राजगड अर्धाच दिसत होता. त्यावर ढगांचा मुक्त संचार सुरु होता. चहापाणी करून गड चढायला सुरुवात केली. सुरुवातीला झाडी-झुडुपातून चिंचोळी वाट जात होती. काही वेळाने एक विस्तीर्ण पठार आलं. समोर अक्राळ-विक्राळ पसरलेला राजगड दिसत होता. तो आपले सुवेळा- पद्मावती माचीरुपी बाहू पसरून खुणावत होता. की या…. निसर्गाच्या या आविष्काराची जादू अनुभवायला, इतिहासाची पानंच्या पानं वाचायला या!! क्षणभरच ढग थोडे विरळ झाले आणि दर्शन घडलं राजगडावरचं निसर्गाचं आश्चर्य असणाऱ्या नेढ्याचं. मन थरारून उठलं आणि त्याच उत्साहात पुढची वाटचाल सुरु केली. 
               थोडी निसरडी, थोडी कोरडी पण छान झाडीतून वाट जात होती. आणि अचानक समोर दिसली ती पद्मावती माचीच्या कड्यावर चढत जाणारी खडी चिंचोळी वाट. दाट धुकं, ती खडी चढण पाहूनच उरात धडकी भरत होती. त्यातून आम्ही वाट निवडली होती ती अवघड समजली जाणारी. गडावर जाण्यासाठी गुंजवणे, वाजेघर, पाली वगैरे गावातून वेगवेगळ्या वाटा आहेत. बहुतेक सगळ्या पद्मावती माचीवर पोचतात. सुवेळा आणि संजीवनी माचीवर येणाऱ्या ज्या वाटा आहेत त्यावरून चढणं किंवा उतरणं त्या वातावरणात निवळ अशक्य. त्यापेक्षा स्वर्गाची वाट कितीतरी सोपी म्हणावी लागेल. त्या खड्या चढणीत दगडात आधार घेत जात होतो. आता  निसरडी मातीतली वाट संपली होती. दगड, खोबणी अशी वाट सुरु होती. एका बाजूला उत्तुंग कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. वास्तविक धुक्यामुळे दरीतलं काही दिसत नव्हतं. दिसलं असतं तर डोळे फिरायचंच काम होतं. पायवाटेच्या शेजारून लोखंडी रेलिंग बसवले होते. त्याचा आधार नसता तर अंगाचा एक छोटासा बाक सरळ स्वर्गाच्या दारी घेऊन गेला असता. काही वेळाने साडेतीन-पावणे चारशे वर्ष समर्थपणे उभी असणारी तटबंदी दिसायला लागली. 
              तटबंदीच्या बाजूबाजूने जात होतो. तरी गडाचा कुठलाच दरवाजा वगैरे दिसत नव्हता. पुढे गेल्यावर एक छोटं दीड-दोन फुटाच भोक दिसायला लागलं. त्यातून आत गेल्यावर लक्षात आलं तो चोर दरवाजा होता. वा! गडावर प्रवेश झाला. पद्मावती तळं समोर दिसत होतं. आणि त्यापाठी राजगडाचा दिमाखदार बालेकिल्ला लपंडाव खेळत होता. ढग कमीजास्त होत होते तसा बालेकिल्ला दर्शन देत होता. पण आजचं टार्गेट बालेकिल्ला नाही तर, ते 'आश्चर्य' नेढ हे होतं. जास्त वेळ न घालवता बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजूने सुवेळा माचीकडे जाणारऱ्या वाटेवर चालू लागलो. आता पावसाला सुरुवात झाली. हातभर लांबवरचंदेखील काही दिसेना. बालेकिल्ला उजव्या बाजूला ठेऊन पुढे जात होतो. माचीवरला फुलांचा गालीचा नजर वेधून घेत होता. दोन्ही बाजूनी चिलखती तटबंदी आणि खोल तुटलेले कडे. माचीचा पसारा निमुळता होत चालला होता. माचीच्या पहिल्या टप्प्यावरचा बुरुज लागला. मराठशाहीची शान असलेला भगवा झेंडा डौलानं फडकत होता. त्या बुरुजाच्या पायऱ्या बाजूला ठेऊन पुढे गेलो. उजव्या बाजूला 'सुवेळा माची दरवाजा' अशी पाटी दिसली. त्या दरवाजात जाउन ठाकलो आणि वाचाच बंद पडायची पाळी आली. समोर दिसणारा निसर्ग डोळ्याचं पारणं फेडणारा होता. 
               दर्याखोर्यातून बेभानपणे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे निर्माण झालेलं ते नेढ. शब्द फुटत नव्हता तिथे बसून. नि:शब्द बसून राहिलो कितीतरी वेळ. पायच निघेना. पण वेळेचं बंधन होतं. परत निघालो. आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. मशीनगनमधून धाड धाड गोळ्या सुटून अंगाला लागाव्यात तसे पावसाचे थेंब अंगावर लागत होते. तसेच पद्मावती माचीवर परत आलो. त्याच वाटेनं गड उतरणं प्राप्त होतं. पुन्हा 'चोर दरवाजात' येउन पाहतो तर काय! त्यातून पाण्याचा प्रवाह बेभानपणे उसळत, फेसाळत खाली जात होता. या अशा वाटेवरून खाली उतरायचं होतं! कितीतरी वेळ नुसतेच पाहत राहिलो. मग हिम्मत करून जीव मुठीत घेऊन प्रत्येक पाउल सांभाळून टाकत तो टप्पा उतरलो. त्या खड्या उतारणीहून पायवाटेवर आलो तेव्हा जरा जीवात जीव आला. धो धो पावसाचा मारा सुरु होता, वाट निसरडी होती पण आता तितकं अवघड नव्हतं. उतरून गावात आलो. गावात आल्याआल्या एका दुकानवजा हॉटेलात गेलो तर त्यांच्या एका वाक्यानं चाट पडलो, ते म्हणाले,
          " गडावरून येताना पाउस घेऊन आलात तुम्ही… "
गावातला 'नेहमीसारखा' असा तो पहिलाच पाउस होता. तिथे स्वतःला आणि नोटा, फोन वगैरे वाळायला घातलं. चहावर चहा पिणं सुरु होतं. चांगले दोन-अडीच तास तिथे होतो. आपसात गोष्टी सुरु होत्या पण मनात त्या अविस्मरणीय अनुभवाची चित्रं कोरली जात होती. समोर गाड्या आणि पुण्याकडे जाणारा रस्ता दिसत होता पण मनात राजगडाने पुन्हा एकदा नव्याने घर केलं होतं. त्या उत्तुंग पहाडावरून नजर हटत नव्हती. गाड्या पुण्याकडे धावत होत्या तरी मनात राजगडावरच्या एकेक प्रसंगांचा चित्रपट धावत होता.

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...