Skip to main content

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती 

‘जस्टिस इज अ‍ॅबस्ट्रॅक्ट बट द लॉ इज फॅक्ट’ असा विचार करण्यास भाग पाडणार्‍या संवादाने चित्रपटाची सुरुवात होते. हा संवाद पुढे येतो तो मुंबईतील नामांकित वकील तरुण सलुजा (अक्षय खन्ना) एका विधी महाविद्यालयात व्याख्यान देत असताना चित्रपटाच्या साधारण सुरुवातीलाच असा प्रश्नार्थक संवाद देऊन, चित्रपट मूळ कथानकाकडे वळतो. या चित्रपटाची कथा भारतीय दंडविधानाच्या कलम 375 आणि 376 च्या भोवती गुंफलेली आहे. पार्श्वभूमी आहे ती नुकत्याच झालेल्या ‘मि टू’ चळवळीची.

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक रोहन खुराणा (राहुल भट) आपल्या घरी आलेल्या कॉस्चूम विभागात काम करणार्‍या मुलीवर बलात्कार करतो. मुलगी पोलीसात तक्रार दाखल करते. दिग्दर्शकाला अटक होते. हिंदी चित्रपटसृष्टी असल्यामुळे प्रकरण माध्यमांमध्ये खूप चर्चेत येते. मीडिया, सोशल मीडियाच्या न्यायालयात दिग्दर्शकाला दोषी करार दिला जातो. सोशल मीडियावर हँग द रेपिस्ट वगैरे हॅशटॅग फिरतो. स्थानिक सत्र न्यायालयात दाखल झालेली तक्रार, वैद्यकीय चाचणी आणि प्राथमिक तपासणीनंतर मिळालेले पुरावे यांच्या आधारावर 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली जाते. पण दिग्दर्शक त्या शिक्षेला उच्च नयायालयात आव्हान देतो. उच्च न्यायालयात त्याच्या वतीने लढायला उभा राहतो. तरुण सलुजा उच्च न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर तपासातील ढिसाळपणा, महिलांच्या बाजूने असणारा कायदा लक्षात घेता पोलिसांतर्फेच बदनामी टाळण्यासाठी लाचेची मागणी आणि   इतर घटकांच्या आधारावर एक वेगळेच चित्र उभे राहाते. अशावेळी निकाल काय द्यावा असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला पडतो. सत्र न्यायालयात उभे राहिलेले चित्र आता पूर्णपणे बदललेले आहे. अशा पार्श्वभूमीवर देखील खटल्याचा निकाल महिलेच्या बाजूने लागतो.

चित्रपटाची कथा आणि पटकथा अतिशय चांगल्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. वक्तव्यातून प्रथमदर्शी पुराव्यांमधून उभे राहणारे चित्र आणि प्रत्यक्षातल्या चित्रातला फरक पटकथेच्या मांडणीतून चांगल्या पद्धतीने मांडला आहे. ह्या कोर्टरूम ड्रामामध्ये वकील म्हणून अक्षय खन्ना आणि रिचा चड्ढा यांनी रंगत आणली आहे.  भारतीय कोर्टरूम इमारतीमधील आरडाओरडा मख्ख चेहर्‍याने बघणारे न्यायाधीश वगैरे प्रकार इथे नाहीत. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या भूमिकेत किशोर कदम आणि कृत्तिका देसाई यांनी जान भरली आहे. चित्रपटात हिंदी मराठी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांचा वापर आहे. न्यायालयातल्या प्रसंगात कायद्यातील तरतुदी आणि त्यातील शब्दांवर कसा खेळ केला जातो. याचे उत्तम चित्रण आहे. ‘मी टू’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहेच पण यानिमित्ताने पुन्हा एकदा विस्तृृत पातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे.


चित्रपटसृष्टीसकट सर्व क्षेत्रांत बढतीसाठी काम मिळण्यासाठी महिला सहकार्‍याकडे किंवा पुरुष सहकार्‍याकडेही लैंगिक सुखाची मागणी करणे हा चिंतनाचा काळजीचा विषय आहे. हे वर्षानुवर्षापासून सुरू असून अमेरिकेत हावॅ विनस्टीन विरोधात सुरू झालेल्या ‘मी टू चळवळीनंतर भारतात देखील महिला पुढे येऊ लागल्या. महिला आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात बोलू लागल्या. कायदेशीर कारवाई करू लागल्या. त्यावर त्यांनी त्याचवेळी  तक्रार का केली नाही. ते महिला उघडपणे बोलू शकत आहेत. हे धाडसाचे कौतुकाचे आहे. सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. महिलांनी अनेक मोठमोठ्या व्यक्तींविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्रांचा देखील समावेश आहे. याच प्रश्नांच्या संदर्भात आरोप असणार्‍या पुरुषांकडून तसेच काही महिलांकडून असा युक्तिवाद केला गेला की जोपर्यंत या महिलांना फायदे मिळत होते तोवर त्यांनी काहीही तक्रार केली नाही. आता कुठलाही फायदा मिळत नाही. ‘मी टू’ चळवळीची हवा आहे तर केवळ सुडासाठी त्यांनी तक्रार दाखल केल्या. तसेच खोट्या तक्रारी दाखल करून पैसे उकळल्याची  प्रकरणेही उजेडात आली. अशा दोन परस्परविरोधी भूमिका आल्यामुळेच काद्यातील तरतुदी  आणि वापरण्यात आलेले शब्द महत्त्वाचे ठरतात. दोन व्यक्तींमधील शारीरिक संबंध केवळ संमती (consent) आहे म्हणून योग्य ठरत नाहीत. तर इच्छा (will) देखील असावी लागते. महिलेची इच्छा (will) आणि संमती (Consent) असेल तरच तो शारीरिक संबंध बलात्कार मानता येणार नाही व कलम 375 मध्ये इच्छा हा शब्द संमतीच्या आधी येतो.
हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. शब्दच्छल, चर्चा करावी तेवढी कमी आहे. मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या सुडापोटी पैसे उकळण्यासाठी  करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींमुळे खर्‍याखुर्‍या भीषण बलात्काराच्या प्रकरणांत देखील पोलीस यंत्रणा, माध्यमे आणि जनतादेखील संशयाने बघायला लागेल. कायदा महिलांच्या बाजूने आहे. असायलाच हवा आहे. पण त्या कायद्याच्या सुडापोटी होणारा गैरवापर टाळण्यासाठी कडक तरतुदी तितक्याच आवश्यक आहेत. अधिक प्रगल्भ, सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी सर्व उपलब्ध साधनांनिशी जनजागृती, चळवळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने एक पाऊल म्हणून अशा चित्रपटांच्या निमित्ताने चर्चा व्हावी ती कायद्यांची सेक्शन 375  मर्जी या जबरदस्ती.

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...