Skip to main content

सवाई एकांकीकोत्सव

सवाई एकांकीकोत्सव 


महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रात एकांकिका स्पर्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही पुणे, मुंबईत आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या नाट्य-चित्रपट सृष्टीसाठी कलाकारांची, तंत्रज्ञांची खाण ठरतात. ही कलाकारांची खाण आता मुंबई-पुण्याच्या पट्ट्याबाहेर वाढू लागली आहे. राज्य नाट्य स्पर्धा, अहमदनगर महाकरंडक, कोकणात पेण, बार्शी, औरंगाबाद, मध्यंतरीच्या काळात सकाळ करंडक आणि आता लोकसत्ता लोकांकिका ही विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण या सर्व चुरशीच्या स्पर्धा प्राथमिक ठराव्यात अशी एकांकिका स्पर्धा आहे ती 'चतुरंग सवाई' एकांकिका स्पर्धा. या स्पर्धेचे स्वरूपच आहे ते 'उत्तमातील सर्वोत्तम निवडण्याची स्पर्धा' असे. राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका साठी असणारा 'जयराम हर्डीकर करंडक' विजेती एकांकिका इत्यादी संघाना सवाई एकांकिका स्पर्धेत प्रवेश मिळतो. त्यानुसार चालू वर्षात सवाई एकांकिका स्पर्धेत राज्यभरातील उत्तम अशा एकांकिका त्यातील सात 'सवाई' च्या अंतिम फेरीत होत्या. ही स्पर्धा मुंबईत संपन्न होते, पुण्यातल्या प्रेक्षकांना यातील एकांकिकांचा आस्वाद घेता यावा म्हणून 'चतुरंग' ने सवाई 'एकांकीकोत्सव' आयोजित केला होता. जिथे 'सवाई एकांकिका' प्रेक्षक पारितोषिक विजेती 'ब्रह्मास्त्र', अंतिम फेरीतील स्पर्धक एकांकिका 'द कट' आणि सवाई एकांकिका प्रथम आलेली 'अ बास्टर्ड पेट्रिअट' या एकांकिका सादर करण्यात आल्या. 



सवाई प्रेक्षक पारितोषिक विजेती एकांकिका 'ब्रह्मास्त्र'. ही एकांकिका पाहिल्यानंतर तिला प्रेक्षक पारितोषिक मिळाले यात आश्चर्य असे काहीच वाटले नाही. एक प्रेक्षक म्हणून मनापासून दाद द्यावी अशीच ही एकांकिका. छोटीशी कथावस्तू आकर्षक, कलात्मक मांडणीने स्मरणीय कशी करता येते हे ही एकांकिका दाखवून देते. कोकणातील 'दशावतार खेळ' हा एक लोकप्रिय आणि त्याचबरोबर कलात्मकदृष्ट्या उत्कृष्ट कलाविष्कार. हे एका बाजूला आणि हे खेळ करणाऱ्या कलाकारांचे दारिद्र्य, त्यांच्या विवंचना, कौटुंबिक कलह एका बाजूला. यातला झगडा, एवढीच 'थीम' आहे असे म्हणू. ही थीम कुठेही लागू पडू शकते. आणि तपशील काहीसे वेगळे पण प्रत्येक ठिकाणी सुंदर कलाकृती निर्माण करता येऊ शकतात. ही थीम कलात्मकरीत्या दशावतार मंडळीतील लोकप्रिय कलाकाराच्या घरात नेली की ब्रह्मास्त्र सारखी छान एकांकिका तयार होते. राजा नेरुरकर हा लोकप्रिय कलाकार, त्याच्या जीवावर त्यांची दशावतार मंडळी चालू आहे अशी जवळजवळ परिस्थिती. पण वाढतं वय आणि ढासळती तब्येत या पार्श्वभूमीवर पत्नीने ठेवलेला, संसार की दशावतार, हा पेच पडणारा प्रश्न तिथे राजा संसाराची निवड करतो आणि त्याच्यासोबतच त्याच्या दशावतार मंडळाची घुसमट सुरु होते. पण एका कारणामुळे तो आपला निश्चय बाजूला ठेऊन पुन्हा उभा राहतो. त्यावेळी एक सुखांत अशी मांडणी राजाचे तप, वरदान म्हणून ब्रह्मास्त्र मागणे, ही पुराणातली कथा रूपक म्हणून वापरत, आधी विरोध करणारी पत्नी, त्याच्या कलेच्या वेडासाठी त्याचे 'ब्रह्मास्त्र' म्हणून पाठीशी उभी ठाकते. अशी साधारण कथावस्तू. 

आता हे कथानक मांडत असताना नेपथ्य रचना, प्रकाशयोजना, अप्रतिम अभिनय यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे संगीत याचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाट्यलेखन, मांडणीमध्ये प्रवेश संपताना ब्लॅकआऊटचा प्रसंग कसा आहे त्यावर तो संपूर्ण प्रवेश प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतो हे अवलंबून असते. या एकांकिकेत पहिला प्रवेश संपताना राजा घरातून पत्नीबरोबर झगडून बाहेर पडतो एक्झिट घेतो आणि लगेच कर्णाच्या वेशात एंट्री घेऊन कुंतीला युद्धापूर्वी दिलेलं वचन आणि तिची निर्भत्सना हा संवाद सादर करतो त्यावेळी ब्लॅकआऊट पूर्वीची प्रकाशयोजना आणि उभा केलेला 'मोमेन्ट' यामुळे स्पष्ट होऊन जातं की पुढे काय असणार आहे. दुसऱ्या प्रवेशाचा ब्लॅकआऊट असाच सुंदर रित्या वर जाणारा प्रसंगाचा आलेख आणि राजा बेशुद्ध पडतो तो पकडलेला मोमेन्ट. पुढे राजाची तगमग दाखवत असताना वापरलेले 'मोंटाज' केवळ अप्रतिम. इकडून माणसे विविध गोष्टी घेऊन मंचावर वावरताना दिसतात आणि अचानक आपल्यासमोर उभी राहते ती गावची जत्रा. असं करत करत एकांकिका पुढे जाते आणि आलेख वर जात जात एक सुखांत दाखवत पडदा पडतो. या सर्व खेळात अभिनय, दिग्दर्शनासोबत प्रकाशयोजना आणि संगीताचा वाटा खूप मोठा आहे. दशावतार खेळात मृदंग, पेटी आणि टाळ यांचा उत्कृष्ट वापर असतो, या एकांकिकेत त्याच वाद्यांचा वापर करत संगीत तयार केलेले आहे. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या या संघातील विद्यार्थ्यांनी ते एकांकितेसाठी खास तयार केलेले असेल तर खरोखर मनापासून दाद द्यावीच लागेल. सुरुवातील म्हणालो तसं या एकांकिकेला प्रेक्षक पारितोषिक मिळाले यात आश्चर्य काहीही नाही पण उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक मिळायला हरकत नव्हती. विशेषतः सवाई करंडक पटकावणारी एकांकिका पहिल्यानंतर तर तीव्रतेने जाणीव झाली. 

राष्ट्रवाद, हिटलर, नाझी अत्याचार हा महाविद्यालयीन वर्तुळातील एकांकिका करणाऱ्या गटांचा आवडता विषय आहे. त्याच त्या कथा वेगवेगळा मसाला वापरून मांडल्या जात असतात. त्याचप्रमाणे विद्यमान भारतात एक विशिष्ट पक्ष, त्यांची राष्ट्रवाद सांगणारी विचारसरणी यांवर या अशा विषयांवरीयल एकांकिकांमधून भाष्य वगैरे करण्याचे प्रयत्न होतात. भाष्य करावं. हरकत नाही पण त्यातही काही कला मूल्य आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यात वस्तुस्थितीची गल्लत असता काम नये. कल्याण येथील दिशा थिएटर्स अँड ओमकार प्रोडक्शन्सची 'अ बास्टर्ड पेट्रिअट' ही एकांकिका वास्तविक तपशिलांच्या चुकांमुळे आणि उथळ लेखनामुळे भिडत नाही. विशेषतः ब्रह्मास्त्र या एकांकिकेने जेव्हा आपलं नाणं खणखणीत वाजवून अपेक्षा उंचावून ठेवलेल्या असताना बास्टर्ड पेट्रिअटचा उथळपणा अधिक जाणवतो. जर्मन शास्त्रज्ञ फ्रित्झ हेबर याच्या कथेवर आधारित ही एकांकिका. सुरुवात होते ती प्रयोगशाळेत हेबरने लावलेल्या अमोनियाच्या शोधाने. त्याचबरोबर पुढे जात त्यानेच शोध लावलेल्या गॅसचा वापर नाझी जर्मनीने ज्यूंना मारण्यासाठी केला. त्याने लावलेल्या शोधामुळे पहिल्या महायुद्ध काळात जर्मन शासन हेबरला कॅप्टनचा हुद्दा देते. इथेच पहिला तपशीलातला घोळ आहे आणि तिथून पुढे सर्व एकांकिका आपली प्रेक्षकांवरचा पकड सोडते. कॅप्टनचा हुद्दा देत असताना वापरलेली लष्करी टोपी, त्यावर नाझी 'हुक्ड क्रॉस' ज्याला काही कारण नसताना स्वस्तिक म्हणतात, ते आहे. त्याचबरोबर त्या प्रसंगी इतर लोक हेबरला नाझी पद्धतीचा सॅल्यूट करतात. नाझी सॅल्यूट पहिले महायुद्ध संपल्यानंतर कित्येक वर्षांनी हिटलर सत्तेवर आल्यावर वापरात आले. त्याचबरोबर हेबर आणि त्याची पत्नी क्लारा यांच्यातील देशप्रेम वगैरेवरील संवाद. गाभा पकड घेऊ शकणार होता परंतु संवाद लेखन अतिशय उथळ आणि त्यात वारंवारता होती. अभिनय देखील उथळ दिसून येत होता. तसाच आणखी एक प्रसंग म्हणजे हेबर आणि आईन्स्टाईन यांच्यातला संवाद. आजच्या काळातले संदर्भ भूतकाळात नेऊन संवाद लिहिल्यासारखे वाटत राहतात. आणि अत्यंत उथळ मांडणीमुळे पकड सुटते. ही सर्व टीका एका बाजूला आणि शेवटचा प्रसंग, हेबर इंग्लंडमधून परत जर्मनीत जाण्यास उत्सुक आहे पण त्याला त्याच्या मित्राचे पत्र आलेले आहे, ते पत्र वाचत असताना केलेला धक्कातंत्र आणि उत्कृष्ट प्रकाशयोजनेचा वापर एका बाजूला. विद्यमान काळावर भाष्य करण्याचा उथळ आणि अयशस्वी प्रयत्न असे या एकांकिकेला म्हणता येईल. 

सोमालियातील भीषण अशा फिमेल जेनिटल म्युटेशनवर जळजळीत भाष्य करणारी 'द कट' ही एकांकिका काही कारणामुळे पाहू शकलो नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करण्यात काहीही अर्थ नाही. ब्रह्मास्त्रला सवाई एकांकिका पारितोषिक मिळायला हवे होते असे ठाम मत आहे. अर्थात ते अर्धवट माहितीवर आणि 'या बास्टर्ड पेट्रिअट' च्या पार्श्वभूमीवर आहे. अंतिम फेरीतील सात एकांकिकांपैकी इतर चार एकांकिका पाहिलेल्या नाहीत. त्या जर पहिल्या तर मत बदलेल कदाचित. आहे उपलब्ध असलेल्या माहितीवरून आहे ते मत मांडले आहे. अर्थात हे वैयक्तिक मत आहे. मतभेद व्यक्त करण्याचा, खोडून काढण्याचा इतरांना अधिकार आहेच. प्रत्येकाचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हेच मर्म आहे, कलाविष्कार हे एक माध्यम तर त्याची समीक्षा हे दुसऱ्या बाजूचे माध्यम. चतुरंगचा हा उपक्रम उत्कृष्ट आहे यात मात्र कोणाचे दुमत असू नये. 

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...