Skip to main content

Freight Equalization Policy

 एक विस्मृतीत गेलेले धोरण; ज्याने प्रादेशिक आर्थिक विषमतेची बीजे रोवली आणि भविष्यकालीन सामाजिक, राजकीय अस्मितांची पायाभरणी केली!



"खनिजसंपदा आणि सुपीक भूमी असूनही बिहार आणि झारखंड अपेक्षित विकास करु शकले नाहीत. Freight Equalization Policy (लिखाणाच्या आणि वाचनाच्या सोयीसाठी हे इंग्रजी नावच वापरले जाणार आहे.) चा यात मोठा वाटा आहे.." दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी २०१७ मध्ये बिहार मधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. 

पूर्व आणि मध्य भारताच्या संपदेच्या जोरावर पश्चिम आणि दक्षिण भारताची भरभराट झाली. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील ही वस्तुस्थिती पूर्व भारतातील एका खासदाराने काहीशा अनावश्यक आक्रमक भाषेत मांडली आणि वादाला तोंड फुटले. पण हे झाले कसे आणि का हा प्रश्न पडतो. प्राचीन, मध्ययुगीन भारतातील समृद्ध राज्ये, साम्राज्ये या प्रदेशातच होऊन गेली. इतक्या प्राचीन काळाचा धांडोळा घेणे इथे अप्रस्तुत आहे, पण ब्रिटिश राजवटीत पूर्व भारताच्या आर्थिक डबघाईचा पाया रचला गेला आणि Freight Equalization Policy ने कळस चढवला असे म्हणावे लागेल.

काँग्रेसने समाजवादी समाजरचनेचा अंगीकार केला होता. त्यानुसार नियोजन आयोग स्थापन झाला होता. पंचवार्षिक योजना आणि त्याद्वारे उद्दिष्टपूर्ती असा कार्यक्रम आखला गेला. पहिली पंचवार्षिक योजना शेतीवर भर देणारी होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासावर भर देण्यात आला. त्याच्या उद्देशिकेत 'सर्व प्रदेशांत शेती आणि उद्योग यांच्या संतुलित आणि समन्वित विकासाच्या आधारे राष्ट्रीय आर्थिक विकास आणि जीवनमान उंचावत नेणे' असे नमूद होते.

वर्ष १९५० मध्ये भारतात टाटा यांचा जमशेदपूर येथील आणि बंगालमधील एक असे दोनच पोलाद कारखाने होते.  'Manufacturing Underdevelopment: India's Freight Equalization Scheme and its long-run Effects of Distortion on Geography of Production' या जॉन फर्थ आणि अर्न्स्ट लिऊ यांच्या शोधनिबंधानुसार, बिहारचा (त्यावेळचा अखंड बिहार) पोलाद उत्पादनातील राष्ट्रीय वाटा ९२ टक्के आणि एकूण कारखानदारीतला वाटा ४८ टक्के होता. पंडित नेहरु यांच्यावर फेबियन सोशालीजम आणि सोव्हिएत रशियाचा मोठा प्रभाव होता. या पार्श्वभूमीवर, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पूर्व भारताला असणारी ही अनुकूलता अन्याय्य आहे असे नेहरु सरकारचे मत होते. यातूनच Freight Equalization Policy चा जन्म झाला, आणि प्रादेशिक आर्थिक विषमतेची बीजे रोवली आणि भविष्यकालीन सामाजिक, राजकीय अस्मितांची पायाभरणी झाली. 

Freight Equalization Policy, हे धोरण १९५२ मध्ये पंडित नेहरु यांच्या सरकारने आणले. यातील मूलभूत तरतूद अशी, खनिज संपदा, त्यातही कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट, अल्युमिनियम, हे पूर्व आणि मध्य भारतात एकवटले आहेत. यावर आधारित औद्योगिक विकास देशभर सम प्रमाणात व्हावा यासाठी उद्योग-कारखाना भारताच्या कोणत्याही प्रदेशात असला तरी, कच्चा माल म्हणजेच खनिज संपदा ही सारख्याच दरात उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी मालवाहतूक खर्च- Freight मध्ये सरकार अनुदान देईल. 

या पार्श्वभूमीवर पूर्व भारताच्या ब्रिटिश काळापासून सुरु झालेल्या आर्थिक पडझडीचा आढावा घेणे आवश्यक आहे. ब्रिटिशांनी आपली साम्राज्यकांक्षा बंगालमधून सुरु केली. सत्ता घेतल्यानंतर बंगाल मध्ये त्यांनी शेतसाऱ्याची कायमधारा (Permanent Settlement) पद्धत बसवली. दुसऱ्या बाजूला आपल्या औद्योगिक क्रांतीला पोषक आणि आवश्यक कच्चा माल खात्रीशीर मिळण्यासाठी शेतीचा आकृतिबंध बदलला. नीळ आणि इतर नगदी पिकांची सक्ती करण्यात आली. भारतीय उत्पादित वस्त्र आणि इतर वस्तूंवर भरमसाट कर आकारुन असंघटित कॉटेज इंडस्ट्री मोडून काढली. त्याच काळात दोन महत्त्वपूर्ण घटनांनी आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्योगाचा आकृतिबंध बदलला. 

पहिली घटना म्हणजे सुएझ कालवा. यामुळे भारतातून युरोपची वाहतूक सुलभ, जलद झाली. प्रचलित केप ऑफ गुड होपला वळसा घालून येणाऱ्या जलमार्गामुळे मुंबई आणि कोलकाता ही बंदरे साधारण सारख्या अंतरावर पडायची. आता युरोपातून मुंबईचे अंतर आणि लागणारा वेळ खूपच कमी झाला. दुसरी घटना म्हणजे अमेरिकी गृहयुद्ध. यामुळे इंग्लंड मधील कापडउद्योगाला मिळणाऱ्या खात्रीशीर कापूसपुरवठ्याला खीळ बसली. तो खड्डा विदर्भ (तत्कालीन सेंट्रल प्रॉव्हिन्स) आणि गुजरात ने भरून काढला. त्यासाठीच मुंबई कडे येणारे रेल्वेचे जाळे पसरले. 

पश्चिम आणि दक्षिण भारतात शेतसाऱ्याची रयतवारी ही पद्धत कायम राहिली. यात व्यक्ती-कुटुंबाकडे शेतजमिनीची मालकी हा घटक महत्त्वाचा ठरला. कायमधारा पद्धतीत जमीनदारी पद्धत दृढ झाली. यात जमिनीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कुळांचे शोषण अधिकाधिक वाढतच गेले. हजारो एकर जमिनीचे मालक ते जमीनदार कोलकाता मध्ये ऐषारामी जीवन जगत, कला-साहित्यात मुशाफिरी करत असताना ग्रामीण भाग, शेतकरी पिचला गेला. जमीनदार, संस्थानिक यांनी काही अपवाद वगळता उद्यम, विकासाला प्राधान्य दिले नाही. 

पश्चिम आणि दक्षिण भारतात बडोदा, कोल्हापूर, म्हैसूर, औंध सारखी संस्थाने आणि तिथले दूरदर्शी संस्थानिक होते. त्यांनी आधुनिकीकरण, उद्योग यांना प्राधान्य देणारे अनेक प्रकल्प राबवले. त्याशिवाय गुजरात आणि महाराष्ट्रात सहकार चळवळीने ग्रामीण भागात एक चैतन्य निर्माण केले. लोकांची क्रयशक्ती मुळातच अधिक होती ती वाढीला लागली. 

अशा सर्व पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर बिहार, बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश मध्ये विपुल खनिज संपदा, जमशेदपूर येथील उद्योग क्षेत्र, सुपीक जमीन होती. तेव्हा Freight Equalization Policy येते. कच्च्या मालाचा मालवाहतूक खर्च अनुदानित झाला. निर्यातीसाठी सर्वोत्तम बंदर मुंबई किंवा दक्षिणेत चेन्नई होती आणि आहेत (आता कांडला, केरळ मधील बंदरांची भर पडली आहे). पश्चिम, दक्षिण भारतातील राज्य सरकारे उद्योगांना सवलतीच्या दरात जमीन आणि इतर सवलती देत होती. शैक्षणिक पायाभरणीमुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. यामुळे उद्योजकांना खनिज संपदा असणाऱ्या प्रदेशात उद्योग उभारण्यासाठी कोणतेही कारण, प्रोत्साहन उरलेच नाही. 

पश्चिम आणि दक्षिण भारतात वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, सिमेंट वगैरे उद्योग उभे राहिले. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत झुडुपे खुडून जातात हे जीवशास्त्रीय सत्य आहे पण ही उपमा औद्योगिक क्षेत्राला बरोबर उलटरीत्या लागू होते. एका मोठ्या वृक्षाच्या वळचणीला शेकडो झुडुपे येतात आणि फोफावतात. पुणे, कोईम्बतूर, चेन्नई, संभाजीनगर, मुंबई, गुजरात, बंगळुरू, हैदराबाद मध्ये हेच झाले. औद्योगिक विकासाबरोबर ही शहरे आणि राज्ये झपाट्याने अधिकाधिक समृद्ध होत गेली. पण कच्चा माल पुरवणारी पूर्व आणि मध्य भारतातील राज्ये अधिकाधिक मागास होत गेली. 

सत्तर-ऐंशीच्या दशकात पूर्वेकडील राज्यातील सूज्ञांना Freight Equalization Policy आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले. त्यांनी न्याय्य 'मिनरल रॉयल्टी' मिळाली पाहिजे यासाठी आवाज उठवणे सुरु केले. (या धोरणाशी संबंधित नसले तरी कच्चे तेल, नारिंगी पम्पिंग स्टेशन आणि आसामला त्याचा न मिळणारा लाभ हेही ऐंशीच्या दशकातील आसाम आंदोलनामागील प्रमुख कारणांपैकी एक होते.) हे लक्षात घेऊन १९७७ मध्ये एक मंत्रिपरिषद गठीत करण्यात आली, त्यांच्या अहवालात या धोरण अंतर्गत मिळणारे अनुदान अगदीच नगण्य आहे असे नमूद करण्यात आले होते. पण हे अनुदान किमतीच्या अगदी नगण्य प्रमाणात असले तरी संख्येच्या प्रमाणात पाहता त्याचा खूप मोठा लाभ उद्योगांना होत होता. वर्ष १९९१ मध्ये अनुदानावर एक कमाल मर्यादा घालण्यात आली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 

या सगळ्यात १९९१ पूर्वीच्या भारताची जी ओळख ते लायसन्स-परमिट राजची चर्चा देखील केलेली नाही. कारण त्यावर प्रचंड प्रमाणात उहापोह झाला आहे. पण हे लायसन्स-परमिट राज आणि Freight Equalization Policy किती डेडली कॉम्बिनेशन होते पहा. संपत्तीचे समतापूर्ण वाटप हा उदात्त उद्देश होता. ती संपत्ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातूनच उत्पन्न होईल याचा आग्रह होता. त्याचवेळी मक्तेदाऱ्या निर्माण होणार नाहीत याचीही दक्षता घ्यायची होती. म्हणजे संपत्ती उत्पन्न होऊच द्यायची नाही पण वाटप करायचे होते. परिणामी १९९१ पर्यंत दारिद्र्याचे समतापूर्ण वाटप झाले. 

पश्चिम आणि दक्षिण भारत आर्थिक प्रगतीत झपाट्याने पुढे गेला. आर्थिक समृद्धी बरोबर सामाजिक रचनेत आपोआप बदल होत गेले. आर्थिक समृद्धी बरोबर शिक्षणाचा झपाट्याने विस्तार आणि स्वीकार झाला. त्यातून प्रबोधन, लोकसंख्या नियंत्रण आपोआप होत गेले. पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांचा लोकसंख्या वाढीचा दर रिप्लेसमेंट रेटच्या खाली गेला. तरुण देशाबाहेर जाण्याचे आणि तिकडेच स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले. आणि पूर्व-मध्य भारतातून रोजगाराच्या शोधात लोकांचे लोंढे वाढले. 

संविधानाच्या अनुच्छेद २८० मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. भारताचा एकूण महसूल आणि त्याचे राज्याराज्यांत वाटप कसे करावे हे ठरवणे हे वित्त आयोगाचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. राज्यांची लोकसंख्या, राज्यांचा आर्थिक-सामाजिक विकास, आर्थिक विकासाचे राज्यांतर्गत समतापूर्ण वाटप अशा निकषांवर हे वाटप निश्चित केले जाते. Freight Equalization Policy आणि त्यापूर्वीच्या काही धोरणांमुळे उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्ये विकासाच्या प्रवाहात मागे पडली. क्रयशक्ती कमी असल्यामुळे उपभोग आधारित अप्रत्यक्ष कर (Consumption based Indirect Taxes) संकलन त्या राज्यांत कमी आहे त्यामुळे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार या राज्यांना एकूण गोळा होणाऱ्या करातील मोठा वाटा जातो. 



उदाहरणार्थ महाराष्ट्रातून समजा १०० रुपये राष्ट्रीय करसंकलनात जमा होतात, पण त्यातील केवळ ७ रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला येतात, झारखंड साठी हेच प्रमाण ३०३ रुपये, ओडिशा साठी १८७ आणि छत्तीसगढ साठी २८२ रुपये आहे. मग महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक सारख्या राज्यांच्या महसुलाचे, त्यांच्या उत्पन्नाचे काय? तर त्याचे उत्तर प्रत्येक महिन्याला घोषित होणाऱ्या जीएसटी संकलनाच्या आकडेवारीत आहे. तो उपभोग आधारित अप्रत्यक्ष कर आहे. ज्याचा अर्धा वाटा थेट राज्याच्या कोषागारात जातो. उद्योग-व्यवसाय, श्रीमंत, क्रयशक्ती असणारा मोठा मध्यमवर्ग, मोठी व्यापारी उलढाल यामुळे या राज्यांचे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत मोठे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या एकूण महसुलापैकी ६७% राज्यांतर्गत स्रोतातून येतो. 

तरीही, आर्थिक सुधारणांचा प्रारंभ झाल्यानंतर आणि १९९३ मध्ये Freight Equalization Policy मागे घेतल्यानंतर माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी पूर्व-मध्य भारतातील राज्यांसंदर्भात एक लक्षवेधी विधान केले होते, 

"Freight Equalization Policy आणि लायसन्स-परमिट राज संपवणे वगैरे आर्थिक सुधारणांतून, झालेल्या नुकसानाची भरपाई होऊच शकणार नाही..." 

वित्त आयोगानुसार होणारे महसूल वाटप ही Freight Equalization Policy मुळे त्या राज्यांच्या झालेल्या नुकसानीची एका अर्थी भरपाई आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर मराठी, कन्नड, तामिळ अस्मिता विचारात घ्याव्या लागतील. आम्ही लोकसंख्या नियंत्रण, आर्थिक विकास करुन गुन्हा केला की काय अशीही भावना तयार झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाला भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन राहण्याचा-उद्योग-व्यवसाय-रोजगार करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. पण त्या अधिकाराचे अरेरावीत रूपांतर होऊ नये याची काळजी घेतच पुढली वाटचाल करायची आहे. अन्यथा भारतीय समाजात नसलेल्या फटी निर्माण करण्याची, असलेल्या अधिकच रुंद करण्याची संधी आपण भारतातील आणि भारताबाहेरील विरोधी शक्तींना देत राहू. भारताची एकता, अखंडता अबाधित राखणे आपले कर्तव्य आहे ते आपण करत राहूच, पण त्यात कोणत्या फटी आहेत त्याचा अभ्यास करुन वेळीच झाकण्यासाठी पाऊले उचलली जावीत यासाठी हा लेखनप्रपंच.  




 

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...