दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी.
ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
“आमचा मुलगा निष्पाप आहे.”
“सरकार खोटे आरोप करते.”
ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो, विश्वास कसा ठेवावा?
मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.
पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या शंभरपैकी नव्व्याण्णव यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.
२०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली पदार्थ असो किंवा देशभरात पकडलेले ISIS प्रेरित ‘लोन वुल्फ’ ही सर्व यशस्वी कारवाया शांततेचा पाया बळकट करत राहिल्या. पडद्यामागे गुप्तचर यंत्रणांनी शेकडो कट उधळले, हल्ले रोखले. अनेकांना अटक झाली, शस्त्रसाठे हाती लागले. या सर्व घटनांच्या छोट्या बातम्या झाल्या, चर्चा नाही.
कारण यशस्वी कारवाई मुख्य शीर्षक होत नाही; पण एक अपयश देश हादरवते.
लाल किल्ल्यातील स्फोट हे असेच ‘निसटते अपयश’. १९ ऑक्टोबरपासून जम्मू-कश्मीरसह गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, पुणे अशा ठिकाणी साखळी अटकसत्रे झाली. इंजिनिअर, डॉक्टर, पॅरामेडिक असे सुशिक्षित लोक या जाळ्यात सापडले. प्राथमिक अंदाजानुसार, सर्व साथीदार पकडले गेल्याचे लक्षात आल्यावर डॉ. उमरने आत्मघातकी स्फोट केला.
तपास सुरू आहे; अनेक माहिती पुढे येईल.
अशा वेळी काही माध्यमांचे नेहमीचेच दृश्य पुन्हा दिसले. दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती.
याचे उत्तर एका वैयक्तिक अनुभवातून देता येईल.
२००४–०५ चा काळ. आम्ही परभणीत राहत होतो. नांदेडमध्ये आमच्या नव्या घराचे बांधकाम सुरू होते. माझा मामा अभियंता असल्यामुळे कंत्राटदार, मिस्त्री हे त्याच्या ओळखीतील.
एका कामानिमित्त मी नांदेडला गेलो होतो आणि परतताना बांधकामाचे साहित्य आणणाऱ्या ट्रकमध्येच यायचे ठरले. परभणीत मला घ्यायला येणारी व्यक्ती उशिरा पोचली, त्यामुळे मी त्या कंत्राटदार-मिस्त्रींच्या घरी थांबलो.
घर अगदी सामान्य. टीव्ही, सीडी प्लेअर, आणि सीडींचा गठ्ठा. मी कंटाळू नये म्हणून त्यांनी टीव्हीवर एक सिनेमा लावला.
तो सिनेमा पाकिस्तानी होता.
प्रश्न तिथून सुरू झाले.
त्या काळात परकीय सिनेमाचा अर्थ, हॉलीवूड, किंवा ब्रूस ली-जॅकी चॅन.
मग प्रश्न निर्माण झाला, पाकिस्तानी सिनेमे? ना ते काही विशेष लोकप्रिय, ना ते जागतिक दर्जाचे. परभणीसारख्या शहरातील एक साधारण कंत्राटदार-मिस्त्रीच्या घरात पाकिस्तानी सिनेमांच्या अनधिकृत सीडींचा गठ्ठा का?
इतकी आवड?
कोणता सांस्कृतिक प्रभाव?
कुठली सामाजिक ओढ?
की अजून काही?
तेव्हा इंटरनेट नव्हते, युट्यूब नव्हता. तरीही त्या "सीडी" घरोघरी कशा? आणि त्या का हव्या असायच्या? हे काही तात्काळ तर्क लावण्यासारखे साधे प्रकरण नव्हते. हा प्रश्न तेव्हाच मनात पेरला गेला.
जेव्हा एखादा दहशतवादी पकडला जातो तेव्हा कुटुंबीय "तो निरपराध आहे" असे सांगतात. शेजारी त्याला ‘चांगला मुलगा’ म्हणतात. पण एखाद्या समाजात आतून काय पाहिले जाते, काय ऐकले जाते, कोणते प्रभाव आणि कथनं प्रसारित होतात, हे बाहेरच्यांना दिसत नाही.
कधी कधी "आम्ही ८०० वर्षे राज्य केले" अशा मानसिकतेची सावली अजूनही काहींच्या अवचेतनात दिसून येते. आणि त्यामुळेच प्रश्न उरतो,
विश्वास कसा ठेवावा?
दहशतवादाच्या विरोधातील युद्ध केवळ सीमेवर नाही तर ते घरोघरी लढायचे आहे. सुरक्षा यंत्रणा हल्ले रोखू शकतात. पण संशय, भीती, आणि अविश्वास यांचं निराकरण 'त्या' समाजालाच करावे लागणार आहे. तोवर हा प्रश्न कायम राहणार आहे,
विश्वास कसा ठेवावा?
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment