Skip to main content

'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका

'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका 



दिल हुंम हुंम करे , घबराए ..... लताचा आवाज आणि एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी चाल. त्या चालीत काहीतरी वेगळे आहे. ह्याप्रकारची चाल, संगीत संयोजन याआधी फारसे कधी ऐकलेले नाही. एक वेगळी अनुभूती आहे. कोठून आली ती? ह्या चालीचा निर्माता कोण? तो आहे आसामचाच नाही तर देशाचा सुपुत्र 'सुधाकांत' भूपेन हजारिका. ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात पसरलेला आसाम भारतीय संस्कृतीचे एक आगळे वेगळे रूप दाखवतो. श्रीमंत शंकरदेवांनी दाखवलेल्या वैष्णव धर्माची पताका आसाम अभिमानाने वागवतो. त्या वैष्णव धर्माचे एक महत्वाचे स्थान म्हणजे माजुली आणि त्या असं पासचे क्षेत्र. त्या क्षेत्रातच आसामच्या ह्या श्रेष्ठ संगीतकार, गायक, गीतकार, कवी, चित्रपटकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण तज्ञाचा जन्म झाला. आसामचे लोकसंगीत, प्रचलित संगीताचे विविध प्रकार आत्मसात करत, असामी भाषेचा गोडवा, शब्दांची गंमत अंगीकारत पुढे त्याने आसामचे नाव देशभरात पोचवले.

तेझपूर सारख्या गाववजा शहरात त्यांची भेट ज्येष्ठ आसामी कवी, नाटककार आणि पहिले आसामी चित्रपटकर्ते  ज्योती प्रसाद अग्रवाल यांच्याशी झाली. त्याचबरोबर क्रांतिकारी कवी आणि लेखक बिष्णु प्रसाद राभा यांच्या संगतीत काव्य लेखन, लेखन, गायन आणि संगीत दिग्दर्शनाचे धडे त्यांनी गिरवले. तेझपूर येथील विद्यालयातून मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पदवी मिळवली. 1949 साली त्यांना न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी ' प्रपोझल्स फॉर प्रिपेरींग इंडियाज बेसिक एज्युकेशन टू युज ऑडिओ-व्हिजुअल टेक्निक इन ऍडल्ट एज्युकेशन' या विषयावर प्रबंध सादर केला. प्रौढ साक्षरतेसाठी दृकश्राव्य माध्यमांचा जास्तीतजास्त उपयोग करण्यासाठी उपाययोजना हा विचार तत्कालीन परिस्थितीत क्रांतिकारी आणि काळाच्या पुढचा ठरणारा आहे. त्यांचा डॉक्टरल थिसीस 'डिमिस्टीफायिंग डॉ. भूपेन हजारिका: एन्व्हिजनिंग एज्युकेशन इन इंडिया' या नावाने छापण्यात आला. कोलंबिया विद्यापीठातून परत आल्यानांतर त्यांनी गौहाटी विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली. गौहाटी विद्यापीठात काही वर्षे शिकवल्यानंतर त्यांनी आपले बस्तान कोलकत्याला हलवले. तिथे त्यांच्या संगीत, चित्रपट कारकिर्दीला बहर आला.  त्या काळात त्यांनी दर्जेदार आसामी चित्रपट केले. त्यातील शकुंतला, प्रतिध्वनी इत्यादी चित्रपटांना विविध पुरस्कार मिळाले.

आसामी लोकसंगीत आणि विविध संगीत प्रकार हाताळत त्यांनी असंख्य गीतांना चाली दिल्या. त्या गायल्या. वयाच्या बाराव्या वर्षी ज्योती प्रसाद अगरवाल यांच्या 1939 साली आलेल्या 'इंद्रमालती' या चित्रपटातील 'बिस्वो बिजाई नौजवान ' आणि 'काखोते कोलोसि लुई ' या गाण्यांपासून त्यांच्या गायन प्रवासाची सुरुवात झाली.  आसामी भाषेतील 'बिस्तीर्नो  परोर , स्नेहे आमार खोतो .. ' ही काही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आसामी भाषेतील संगीत, चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द सुरु असतानाच 1980 च्या दशकात हजारिका यांची भेट स्त्रीवादी कलाकार, चित्रपटकर्त्या कल्पना लाजमी यांच्याशी झाली. कल्पना लाजमी यांच्या हिंदी चित्रपटांना हजारिका यांनी दिलेले संगीत घराघरात पोचले. पूर्वी विविध उपक्रम, कार्यक्रमांद्वारे त्यांनी आसामी लोकसंगीत देशपातळीवर आणले होते. हिंदी चित्रपटामुळे त्याचे क्षितिज अधिक विस्तारले. कल्पना लाजमी यांच्या एक पल, रुदाली, दामन या चित्रपटातील त्यांचे संगीत गाजले. या चित्रपटातील बहुतेक गाणी मूळ आसामी गीताचा हिंदीत अनुवाद करून घेण्यात आलेली होती. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मान मिळाले. 1977 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. अरुणाचल प्रदेश सरकारने सिनेमा आणि चित्रपट या माध्यमातून आदिवासी विकासासाठी विशेष कार्य केल्याबद्दल सुवर्णपदक देऊन सन्मान केला आहे.1987 साली  संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुढे 1998 ते 2003 या काळात ते स्वतः संगीत नाटक अकादमीचे प्रमुख होते. 1993 सालात जपानमधील 'एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये रुदाली या सिनेमातील संगीतासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. ह्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय भारतीय होते. 1992 साली त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. 2001 साली पद्मभूषण, 2009 साली आसाम रत्न  आणि 2019 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

आसामच्या ह्या सुपुत्राने तेथील लोकसंगीताचीच नाही तर एकंदर संस्कृतीची ओळख उर्वरित भारताला करून दिली. उत्तर-पूर्व भारताकडे उर्वरित भारताचे होणारे दुर्लक्ष हा आजही कळीचा मुद्दा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आसामातील लोक आपला भारतीय आत्मा कायमच जपत आलेले आहेत. आता अधिकाधिक पुढाकार उर्वरित भारताने घेण्याची गरज आहे. ही दरी मिटवण्यासाठी सांस्कृतिक आघाडीवर 'सुधाकांत' डॉ. भूपेन हजारिका यांनी प्रचंड मोठे कार्य केले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान हा त्या प्रचंड कार्याचा यथोचित सन्मान आहे.

पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...