Skip to main content

राम मंदिर: राम विचार, राम विधान


उदंड जाहले पाणी 
स्नानसंध्या करावया 
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।।

बुडाली सर्वही पापे
हिंदुस्थान बळावले 
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।।

साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते" 

आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील. 

आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.  

हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे ही भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा! इतके जीवघेणे आघात झाले, अजूनही होत आहेत, होत राहणार आहेत तरीही आपण टिकून कसे राहिलो? भारतात राजकीय विविधता कायमच राहिली आहे. ठिकठिकाणची पारंपरिक विविधता राहिली आहे. सामाजिक विविधता ही विषमतेच्या पातळीवरची राहिली आहे. हीच विषमता बाह्य आक्रमणांना आमंत्रण देणारी, विनाश ओढवून घेणारी ठरली आहे. तरीही टिकून राहिलो कसे? 

ही संस्कृती नित्य नूतन इति सनातन आहे. ती काळाबरोबर प्रवाही राहते. नव्या प्रवाहांनुसार बदल करते. बदल अंगिकारते. परंपरेचा गाभा तोच राखून आधुनिकतेशी सांधा जोडते...  आणि क्षात्रतेज कायम राखते!

उत्तरेत राजा दाहीर, जयपाळ, अनंगपाळ प्राणांतिक लढे देत असताना मध्य भारत निराळे मापदंड प्रस्थापित करत होता. जयपाळ-अनंगपाळ यांच्या मदतीला ललितादित्याचे साम्राज्य धावून जात होते. विविधता असली तरी एक साह्चार्याची आणि सांस्कृतिक एकतेची भावना होतीच. इस्लामी आक्रमणाच्या रेट्यापुढे भारताचे क्षात्रतेज काहीसे क्षीण झाले असे वाटेपर्यंत बाप्पा रावळ, चाहमान, चालुक्य, राष्ट्रकूट, सेन, परमार अशी शक्ती उभी राहते. उत्तरेत लढे सुरु असताना दक्षिण भारत अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत यांची परंपरा कायम करत होता. 

उत्तरेतले क्षात्रतेज काहीसे क्षीण झाले असे वाटत असताना त्याला क्षत्रिय आणि धार्मिक पुनरुत्थान दक्षिणेकडूनच सातत्याने मिळत गेले. यादव, कदंब, काकतीय, होयसाळ, पांड्य, चेर, पल्लव असे करत ही परंपरा विजयनगर पर्यंत चालत आली. क्षात्रतेज कायम राखत एक सातत्यपूर्ण लढा दक्षिण आणि पूर्वेच्या राज्यांनी दिला. ओडिशाचे गजपती, आसामचे आहोम यांनी जगन्नाथाच्या आशीर्वादाने आणि आसामने श्रीमंत संकरदेवांच्या धार्मिक पाठिंब्याने केले.  

विजयनगरच्या पतनानांतर एक काळरात्र येऊ पाहत होती, पण एक शतसूर्य सह्याद्रीच्या भूमीत उगवला ज्याने भारतभूमी उषःकालाकडे नेली. शिवाजीराजा छत्रपती होणे ही भारतभूमीतली गंगा-सिंधू-सरस्वती मुक्त करणारी घोषणा होती. त्याचीच प्रेरणा सातत्याने तेवती आहे, जी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेतून काही अंशी पूर्ण होत, एक पायरी चढली आहे. 

राम मंदिर ही एका आधुनिक क्षात्रतेजाची प्राण प्रतिष्ठा आहे. ती अमृत काळाची प्रेरणा आहे. ती राम नीती, राम नेती, राम विचार, राम विधानाची प्रेरणा आहे. ती वृद्धिंगत करत नेली तरच 

स्वर्गीची लोटली जेथे 
रामगंगा महानदी 
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी।

जय श्री राम!




Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...