Skip to main content

मंदिर: आर्थिक उलाढालीचे केंद्र


श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचंद्रचरणौ शरणम् प्रपद्ये।

अयोध्या श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. अवघा भारत राममय झाला आहे. अनेक शतकांची प्रतीक्षा, कारसेवा, अनेकांचे बलिदान यांचे परिणाम स्वरुप हे मंदिर उभे राहत आहे, यामुळे सामान्यजन आनंदी आहे, समाधानी आहे. विरोध करणारे आहेतच. ते विरोध करतच राहणार. 

मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे अशा शब्दांत खिल्ली उडवताना आक्षेप घेतले जायचे की मंदिर बांधल्याने रोजगार मिळणार आहेत का? लोकांचे जीवनमान सुधारणार आहे का? लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत का? असले प्रश्न उपस्थित केले जातात. मंदिर बांधण्याऐवजी शाळा, हॉस्पिटल बांधा वगैरे शहाणपणाचे सल्ले देखील दिले गेले, अजूनही दिले जात आहेत. या सगळ्यामागे हिंदू मताचा, हिंदू धर्माचा आकस हे एक कारण आहेच त्याशिवाय मंदिर आणि अर्थकारण या विषयाचे अज्ञान किंवा दुर्लक्ष हेदेखील एक कारण आहे. याच अनुषंगाने मंदिर आणि अर्थकारण या विषयाचा हा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. 

प्राचीन काळापासून भारतीय मंदिरे एका अर्थाने स्वायत्त, स्वयंपूर्ण संस्था होत्या, काही अंशी आहेत. तिथे त्या त्या आगम परंपरेनुसार अनुष्ठान, पूजा, उत्सव होतात. यासोबतच मंदिरे ही कला, साहित्य, शिक्षणाची केंद्रे होती. विज्ञानविषयक चर्चांची केंद्रे होती. त्या त्या वेळच्या राजा-महाराजांनी, महाजनांनी ही मंदिरे उभारण्यात योगदान दिलेले होते, त्याचबरोबर मंदिराची व्यवस्था चालण्यासाठी जमिनींचे दान, वर्षासन, वतन दिलेले असे. त्यामुळे मंदिरे एक परिपूर्ण संस्था असत. इस्लामी आक्रमणांच्या मध्ययुगीन कालखंडापासून हे स्वरूप बदलण्यास सुरुवात झाली आणि इंग्रज काळात त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले. 

स्वातंत्र्योत्तर काळात देखील भारतातील प्रमुख मंदिरे, त्यांच्या यात्रा, जत्रा नित्यनेमाने चालत आल्या. त्यांचे स्वरूप कणाकणाने बदलत गेले. काही एक आकार येत प्रमुख मंदिरांच्या भोवती एक वेगळी अर्थव्यवस्था उभी होत गेली. त्यात वाहतूक, राहण्याची व्यवस्था (यात धर्मशाळा ते तारांकित हॉटेल सगळे आले), खानपान व्यवस्था, फुले, फळे, पूजा साहित्य, वस्त्रप्रावरण, धार्मिक साहित्य, धार्मिक कलाप्रकार वस्तू (भजन, कीर्तन यांच्या कॅसेट, सीडी वगैरे) असे अनेक घटक अंतर्भूत असणारी व्यवस्था उभी होत गेली. त्याचे नियोजन निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या प्रकारे होत असे, होत आहे. बहुतेक मंदिरे सरकार नियंत्रित आहेत. ही झाली थोडक्यात पूर्वपीठिका.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्रांचा धार्मिक पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीने विकास हे उद्दिष्ट मांडले. त्यानुसार केंद्र सरकार, राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर काम करुन उत्तराखंड मध्ये केदारनाथ धाम, काशी विश्वनाथ धाम, उज्जैन महाकाल, सोमनाथ, द्वारका (निर्माणाधीन), पावागढ, जगन्नाथ, पंढरपूर (प्रस्तावित) या ठिकाणची विकासकामे झाली आहेत किंवा होऊ घातली आहेत. तिथे येणारे भक्त, भाविक, यात्री यांची संख्या यावरच तेथील आर्थिक उलाढालीचे गणित अवलंबून आहे, हे तर निश्चित. या आधारावरच यातील काही ठिकाणांची पूर्वी आणि नंतर अशी आकडेवारी पाहून पुढे जाऊ. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उदघाटनानंतर वाराणसीला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांच्या संख्येत १० पटीने वाढ झाली आहे. ही संख्या १० कोटींच्या पुढे गेली आहे. उज्जैन महाकाल कॉरिडॉर होण्यापूर्वी शनिवार-रविवारी प्रतिदिवशी ६०-७० हजार भावीक, प्रवासी येत असत, कॉरिडॉर निर्मितीनंतर ही संख्या १.५-२.५ लाखांच्या घरात गेली आहे आणि सातत्याने वाढतच आहे. 

ही झाली प्राथमिक आकडेवारी. ICICI बँकेने केलेल्या एका सर्वेक्षणात काशी विश्वनाथ धाम निर्मितीनंतर वाराणसी मधील लोकांच्या उत्पन्नात २०-६५ टक्के वाढ झाली आहे तर रोजगार निर्मितीमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. NSSO च्या आकडेवारीनुसार धार्मिक कारणासाठी होणाऱ्या प्रवासासाठी प्रतिदिन प्रतिमाणशी २७१७ रुपये खर्च होतात, शैक्षणिक प्रवासासाठी २२८६ रुपये तर इतर प्रवासासाठी १०६८ रुपये खर्च होतात. म्हणजे धार्मिक कारणासाठी होणाऱ्या प्रवासात प्रतिदिन १३१६ कोटी रुपये खर्च होतात, म्हणजेच वार्षिक ४.७४ लाख कोटी रुपये.    भारतभरातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि त्याभोवती असणारे घटक मिळून होणारी आर्थिक उलाढाल ही ३.०२ लाख कोटी रुपये (४० बिलियन डॉलर) जी अर्थव्यवस्थेच्या २.३२ टक्के इतकी आहे. 

ही झाली प्रत्यक्ष त्या ठिकाणची आकडेवारी किंवा व्यवस्था. पण या ठिकाणी येणाऱ्या भाविक, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, फळे-फुले यांची शेती, दूध उद्योग यांनादेखील मोठ्या प्रमाणात चालना मिळते. उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढते. वाराणसी हे शहर मंदिरे, गंगेचे घाट यासह तेथील वैशिष्ट्यपूर्ण खानपानासाठी देखील प्रसिद्ध आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर नंतर भाविक, प्रवाशांची आणि पर्यायाने त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत झालेल्या प्रचंड वाढीमुळे प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल मालकांनी आपापल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. शाखा वाढवल्या आहेत. साधारण हाच प्रकार सर्व ठिकाणी दिसून येत आहे. 

मंदिर, आर्थिक उलाढालीचे केंद्र कसे हा विचार करत असताना तिरुपती, शिर्डी, सिद्धिविनायक इत्यादी प्रसिद्ध आणि श्रीमंत देवस्थानांचा परामर्श का घेतला नाही असा प्रश्न येऊ शकतो. त्यांचा विचार यासाठी नाही केला की या देवस्थानांत वर्षानुवर्षांपासून सातत्याने आणि सातत्यपूर्ण वाढ होतच आली आहे. तेथील व्यवस्था घट्ट बसल्या आहेत. आणि इथे मंदिर आरोग्य, शिक्षण पुरवणार का वगैरे प्रश्नांची उत्तरे आहेत. यातील अनेक मंदिर संस्थाने स्वतःच्या शाळा, हॉस्पिटल, वृद्धाश्रम यांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. आकारमानाचा विचार करता इतर अनेक NGO विचार देखील करु शकणार नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणावर हे चालते. हे झाले मंदीर संस्थान द्वारे होणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे. 

मूळ मंदिर, त्याची धार्मिकता पावित्र्य अबाधित राखून परिसराचा कॉरिडॉर म्हणून विकास केल्याने तरुणाई देखील तीर्थक्षेत्र पर्यटनाकडे आकर्षित झाली आहे. त्याची प्रेरणा आता भलेही सोशल मीडिया वरील लाईक वगैरे असली तरी मंदिरात जाताना ती भक्तिभावानेच जाते. नित्यनूतन इति सनातन या सूत्राप्रमाणे सतत प्रवाही असणारा आपला धर्म यातून तरुणाई आकर्षून घेत आहे. तरुणाई आपल्या आकलनानुसार धर्माकडे पाहत आहे. हे तर आपल्या धर्माचे सौंदर्य आहे. सुरुवातीला हा काहीसा उन्मादी वाटत असला तरी यातून अधिक अर्थवाही आणि धर्म अबाधित राखण्याच्या प्रेरणा निर्माण होणार आहेत हे नक्की. 

भांडवलशाही हे सध्याच्या जगाचे एक वास्तव आहे. पैसा, उत्पन्न वाढत जाते त्याप्रमाणे Quality of Life वाढत जाते. किंबहुना चांगल्या जीवनशैलीचे आकर्षण वाढत जाते. त्यातून मग त्याच ठिकाणी खासगी शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग मॉल पासून सर्व सुविधा येऊ लागतात. हे वर्तुळ चक्राकार पद्धतीने वाढतच जाते. कसे? श्रीराम मंदिर बांधणीच्या घोषणेपासून अयोध्येतील जागांचे भाव झपाट्याने वाढू लागले. मंदिरासोबत अयोध्या शहरातील रस्ते मोठे झाले. अयोध्या रेल्वे स्थानक मोठे, सुसज्ज झाले. अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज झाले. अयोध्येत साधारण ते सप्ततारांकित अशा हॉटेल बांधणीला वेग आला. मंदिर प्राण-प्रतिष्ठा होण्यापूर्वीच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात २०००० हुन अधिक रोजगार निर्माण झाले आहेत असे इंडिया टुडेने नमूद केले आहे.  असे सर्व अभिसरण सुरु झाले आहे. हे झाले अयोध्येपुरते, पण ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन च्या मते अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठेमुळे देशभरात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. देशभरात विवीध मंदिरातील कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवामुळे ही उलाढाल होणार आहे. 

एका मंदिराचे निर्माण हे केवळ धार्मिक, सामाजिकच नाही तर आर्थिक अभिसरणाला देखील चालना देणारे  ठरणार आहे. त्याचबरोबर देशभरातील अनेक मंदिरे, तीर्थस्थाने पायाभूत सुविधा विकासामुळे अधिकाधिक सहजसाध्य होणार आहेत. तसेच त्याठिकाणी कॉरिडॉर सारख्या विकासामुळे पर्यटनाला आणि परिणामी आर्थिक विकासाला चालना देणार आहेत. मंदिरे पुन्हा एकदा आर्थिक उलाढालीचे, आर्थिक विकासाचे केंद्र होणार आहेत यात शंका नाही. 

- विश्व संवाद केंद्र साठी. 

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...