Skip to main content

ताश्कंद फाईल्स : विचारात पाडणारा सिनेमा






‘Your Prime Minister is Dead’ अशी बातमी एखाद्या देशाच्या पंतप्रधानासंबंधी परदेशातून आली तर काय होईल? साहजिकच देशभर दु:खाची काहीशी निराशेची भावना तयार होईल. त्यातही जर तो पंतप्रधान एका युद्धाचं यशस्वी नेतृत्व करू शकलेला पंतप्रधान असेल तर भावना अधिक तीव्र होते. तो पंतप्रधान युद्ध जिंकल्यानंतर देशाच्या आर्थिक नाइलाजापोटी शांतता करार करण्यासाठी परदेशात जातो. करारावर स्वाक्षऱ्या करतो आणि त्यानंतर काही तासात त्या पंतप्रधानाचा मृत्यू होतो. त्यानंतर देशात भावना दु:खाची नाही तर संशयाची तयार व्हायला हवी होती. राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर हा प्रश्न उपस्थित होणे आवश्यक होते की पंतप्रधानांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. योग्य ते सर्व वैद्यकीय अहवाल तपासले जावेत  आणि शवविच्छेदन अहवाल तपासला जावा. समोर येते ती माहिती अशी की शवविच्छेदन तपासणी Post Mortem केले गेलेलेच नाही. हाच धागा पकडून माहिती अधिकार कार्यकर्ते अनुज धर यांनी अथक अभ्यासातून एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे पुस्तक प्रसिद्ध केले. ‘Your Prime Minister is Dead’l  त्यावर आधारित प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी वेगळ्या धाटणीचा सिनेमा केला आहे. ताश्कंद फाईल्स. त्याच्या केंद्रस्थानी आहे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा गुढ मृत्यू.
सिनेमा सुरू होतो लाल बहादुर शास्त्रींच्या आवाजातील भाषणाने ज्यात ते पाकिस्तानच्या आगळिकीला शस्त्राने उत्तर देण्याची आवश्यकता अधोरेखित करताना दिसतात. ताश्कंद करारावरील सह्या आणि शास्त्रीजींचा मृत्यू इथपर्यंत दुसर्‍या सीनमध्ये दिसते ते 1992 सालातील लाटव्हियाची राजधानी रिगामधील ब्रिटिश दूतावास. एक माणूस मोठाल्या सुटकेस घेऊन अवतरतो. मिनतवारीने ब्रिटिश राजदूतांची भेट घेतो. सुटकेसमध्ये असतात सोव्हियत रशियाची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना केजीबीची गुप्त कागदपत्रे. त्यात केजीबीने जगभरात काय उत्पात माजवला होता. देशोदेशीच्या नेत्यांच्या हत्या घडवून आणल्या होत्या. याचे अहवाल तो माणूस म्हणजे केजीबीच्या अभिलेखागाराचा माजी प्रमुख व्हॅसिली मित्रोखीन. तिथून सिनेमा येतो आजच्या काळात, दिल्लीत एक राजकीय पत्रकार जी एका ‘स्कूप’ च्या शोधात आहे. तिला निनावी फोनद्वांरे शास्त्रीजींचा मृत्यू हा विषय सुचवला जातो  आणि संबंधित कागदपत्रे पुरवली जातात. तिच्या वर्तमानपत्रात गूढ मृत्यूची कथा हेडलाईन म्हणून छापली जाते आणि सुरू होतो राजकीय गदारोळ. त्यातून केंद्रीय गृहमंत्री (नासिरुद्दीन शहा) विरोधी पक्ष नेता श्याम सुंदर त्रिपाठी (मिथुन चक्रवर्ती) यांच्या नेतृत्वाखाली समितीचे गठन करतात आणि सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. त्यापुढील कथाभाग सिनेमात पाहणेच अधिक चांगले.
विवेक अग्निहोत्री यांनी हा तसा डॉक्युमेंटरीचा असलेला विषय ‘फीचर फिल्म’ स्वरूपात उत्तम पटकथेत बांधला आहे. त्यात विद्यमान राजकीय, सामाजिक प्रवाह उत्तमरीत्या उभे केले आहेत. प्रस्थापित तथाकथित बुद्धिजीवी इतिहासकारांचे प्रतिनिधित्व करणारे पल्लवी जोशी यांनी साकारलेले पात्र, तथाकथित पंचतारांकित समाजसेवेच्या आडून एका फुटीरतावादी, अराजकतावादी विचारसरणीचा प्रसार-प्रचार करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे मंदिरा बेदी यांनी साकारलेले पात्र निवृत्तीनंतर विविध कमिट्या किंवा सरकारी पदांसाठी सरकारच्या ‘गुड बुक्स’ मध्ये राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे विश्व मोहन बडोला यांनी साकारलेले पात्र, गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख यांचे पात्र प्रकाश बेलवडी, राष्ट्रीय अभिलेखागाराचे माजी प्रमुख यांचे पात्र राजेश शर्मा यांनी साकारले आहे. ‘यह देश गांधी नेहरू का देश है’ असा सातत्याने उद्घोष करणारे आणि शास्त्रीजीका क्यों नही?’ या प्रश्नावर चवताळून उठणारे एका राजकीय पक्षाच्या युवा वाहिनीचे प्रमुख हे पात्र, आणि डबल एजंट, देशद्रोही मानल्या गेलेल्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याचे पात्र जे विनय पाठक यांनी साकारले आहे. त्याचप्रमाणे मुख्य कथा घोटाळते ते पात्र श्वेता बसू प्रसादने उभे केले आहे. सिनेमाची मांडणी, त्यातला आशय खिळवून ठेवणारा असला तरी रूढार्थाने  मनोरंजनात्मक सिनेमा नाही.
लाल बहादुर शास्त्रींच्या मृत्यूसंबंधी विविध विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूमुळे कोणाला काय फायदा झाला असता किंवा झाला आहे याची चर्चा उत्तरार्धात करण्यात आली आहे. ‘मित्रोखीन अर्काइव्हज’ नुसार शीतयुद्धकाळात भारत आंतरराष्ट्रीय हेरसंस्थांसाठी कसे नंदनवन होता. तत्कालीन भारतात वर्तमानपत्रे, बुद्धिजीवी, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक नेते केजीबीच्या प्रभावाखाली कसे होते याची धक्कादायक माहिती समोर येत जाते. दिल्लीचा ‘ल्युटीअन्स’ भाग कसा आजही सत्तेच्या प्रांगणात महत्त्वाचा आहे. ल्युटीअन्स हा केवळ एक भाग नाही तर कंपू, कोंडाळे, विचारसरणी आहे त्याच्या बाहेरील व्यक्ती सर्वोच्च पदी बसलेली त्यांना सहन होत नाही. त्या वर्तुळाबाहेरचे फार कमी लोक सर्वोच्च पदावर बसू शकले आहेत. त्यातील एक शास्त्रीजी होते. शास्त्रीजींचे हरितक्रांती, लष्कराचे बळकटीकरण आणि त्यासारखे इतर अनेक निर्णय ल्युटीअन्स आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून वावरणाऱ्या अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकणार होते का? 1965 च्या युद्धातील विजय काही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यक्ती संस्थांसाठी त्रासदायक ठरू शकणार होता का? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा हा चित्रपट विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सोडतो. एका विशिष्ट वर्तुळाच्या विचारसरणीला त्यांनी मांडलेल्या ‘नॅरेटिव्ह’ला धक्का देणारा प्रश्न विचारणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे त्या वर्तुळाशी जवळ असणाऱ्या माध्यमांनी या सिनेमाची दखलच घेतलेली नाही किंवा पूर्वग्रहदूषित समीक्षा, अभिप्राय व्यक्त केले आहेत. ते काहीही असले तरी एकदा अवश्य पहावा असा वैचारिक खाद्य पुरवणारा हा सिनेमा - ताश्कंद फाईल्स.


पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...